

शाम धुमाळ
कसारा : मुंबई नाशिक महामार्गावरील आसनगाव उड्डाण पुलावरील रस्त्याला मोठं मोठे तडे जाऊन सर्व्हिस रोडला भगदाड पडले आहे. यामुळे वाहतुकदार, वाहन चालक प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुंबई नाशिक महामार्गवरील आसनगावजवळ चौफुली रस्ता असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. परिणामी अपघाताचे प्रमाण देखील वाढले होते.यासाठी या महामार्गवर जोधळे कॉलेज ते हिंदुस्थान पेट्रोलपम्प दरम्यान मागील वर्षी मुंबई नाशिक महामार्गवरील वाहन चालकाची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उड्डा पूल बांधण्यात आला होता. त्यामुळे या पुलावरून नाशिक, मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत सुरु झाली व पुलाखालून शहापूरहुन आसनगाव रेल्वे स्थानकाकडे जाणारी वाहतूक सुरळीत सुरु झाली.
परंतु एक वर्षापूर्वी उभारलेल्या या पुलाचे काम दर्जात्मकन झाल्याने या पुलावरील रस्त्याला दहा फुटांपेक्षा जास्त लांबीचे व एक ते दोन इंच रुंदी चे ४ ते ५ ठिकाणी तडे गेले आहेत. रस्त्याच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडला मोठे भगदाड पडले आहे. पाऊस सतत सुरु राहिल्यास काहीअंशी खचलेला रस्ता मोठ्या प्रमाणात खचण्याची शक्यता आहे. परिणामी वर्षभरात रस्त्याला तडे जाऊन रस्ता खचत असल्याने या उड्डाणं पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीची चौकशी करून रस्त्याचे ऑडिट करण्याची मागणी वाहन चालक दुर्गेश सोनवणे यांनी केली आहे.
पुलाला उंदीर, घुशीचा वेढा...
दरम्यान या पुलाचे काम करताना भरावासाठी मातीचा वापर जास्त प्रमाणात केला आहे. यामध्ये खडी, सिमेंटचा वापर नसल्याने या पुलाच्या भिंती पोखरून उंदीर, घुशी यांनी पुलाच्या आत आपले वास्तव्य निर्माण केले आहे. या पुलाच्या खालून थेट वर महामार्गवरील सर्व्हिस रोडपर्यंत या घुशीनी रस्ता पोखरला असल्यामुळे रस्ता खचत जातं असल्याचे चित्र घटनास्थळी स्पष्ट दिसत आहे. दरम्यान या प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान या पुलाला गेलेल्या तडे प्रकरणी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन दुरुस्ती करावी अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.