

भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या बुधवारच्या महासभेत टिपू सुलतान चौकाच्या नामांतराचा विषय चर्चेला येणार आहे. हा विषय शहरात चर्चेचा आणि वादाचा ठरत आहे. 9 वर्षांपूर्वी त्यावेळच्या भाजप सत्ताधाऱ्यांनीच टिपू सुलतान चौक नामांतराचा ठराव मंजूर केला होता. आता त्याचेच पुनर्नामांतर भाजप सत्ताधाऱ्यांकडूनच केले जात असल्याने भाजपचा शहरात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप शिंदे शिवसेनेने भाजपवर केला आहे.
13 डिसेंबर 2016 रोजीच्या महासभेत भाजपचे आ. नरेंद्र मेहता हे त्यावेळच्या ठरावातील सूचक असून याच पक्षाच्या नगरसेविका वर्षा भानूशाली अनुमोदक आहेत. त्यावेळी महापौरपदी भाजपच्याच गीता जैन या होत्या. यावेळच्या महासभेत म्हैसूरचे राजे टिपू सुलतान यांचे नाव मीरारोड येथील चौकाला देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. आता 9 वर्षांनंतर पुन्हा त्याच चौकाचे पुनर्नामांतर करून शहराचे वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजप करीत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
भाजप शहरातील विकासाच्या मुद्द्याला बगल देत धार्मिक राजकारण करीत असून शहरात सध्या वाहतूक कोंडी, आरोग्य सुविधा आणि पायाभूत सोयी-सुविधांचे अनेक प्रश्न लोकांना भेडसावत आहेत. जनतेला अपेक्षित असलेला विकास आणि त्यांना मिळणारा न्याय यावर चर्चा होणे आवश्यक असताना सत्ताधारी भाजप बुधवारच्या महासभेत अशा विवादास्पद मुद्द्यांना प्राधान्य देत आहे. त्यावर शिवसेने आसूड ओढले आहे. 13 डिसेंबर 2016 रोजीच्या महासभेत टिपू सुलतान यांचेच नाव मीरारोड येथील चौकाला देण्याचा ठराव ज्यांनी मंजुर केला तेच विरोध करीत आहेत, असा प्रश्न केला आहे.