

ठाणे: अमराठी रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी भाषा बोलण्याची सक्ती असलेला कायदा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी रद्द केला नसून त्यांनी भाषा शिकण्यासाठी आम्ही दिलेल्या चार महिन्यांऐवजी एक वर्षाची मुदत वाढून दिलेली आहे.
त्यामुळे तुम्हाला मराठी बोलावेच लागेल. कुणी मराठीचा अभिमान, तिच्या अस्मितेशी खेळू नये, मराठीचा आदर केलाच पाहिजे, उन्माद करू नका, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी ठाण्यात दिला.
राज्यातील अमराठी रिक्षा-टॅक्सीचालकांवर मराठी भाषा न आल्यास कारवाईची प्रक्रिया परिवहन विभागाने सुरु केली होती. त्यामुळे अमराठी चालकांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यानंतर गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईच्या नोटिसांना स्थगिती देत मराठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिली. त्यावरून विरोधक आणि अमराठी चालकांनी मुंबईत भोजपुरी गाणी वाजवून जल्लोष केला.
विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना शिवसेनेला विश्वासात न घेता मुदतवाढ दिल्याची टीका सुरु केली. त्यावर बोलताना परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. मराठीची सक्ती रद्द केलेली नाही. त्यांना शिष्टमंडळ भेटले आणि मुदतवाढीची मागणी केली. मुख्यमंत्री यांचा निर्णय हा आमच्यासाठी बंधनकारक असल्याचे सांगून मुदतवाढीचा निर्णय महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात १० लाख अमराठी चालक असून १ लाख ६५ हजार ६०० अमराठी चालकांना मराठी शिकविण्यात आले. उरलेल्या चालकांना मराठी शिकण्यासाठी वर्षाची मुदत देण्यात आलेली आहे. पुन्हा १ ऑक्टोबरपासून राज्यभरात मराठीचे धडे गिरविले जातील.
ती मुदत संपताच २८ ऑक्टोबर २०२७ पासून पुन्हा कारवाई सुरु होईल, असेही सरनाईक यांनी बजावले आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकांमुळे ही मुदतवाढ देण्यात आली असेल असे मला वाटत नसून स्थानिक भाषेच्या मुद्द्यावर दुसऱ्या राज्यातील निवडणुका जिंकता येत नाही,या असे सरनाईक यांनी सांगितले.