

ठाणे : ‘उमरा’ या धार्मिक विधीसाठी महाराष्ट्रातून सौदी अरेबियामध्ये गेलेले हजारो मुस्लिम बांधव युद्धामुळे तेथेच अडकून पडल्याची माहिती उघड झाली आहे.
रमजानच्या काळात दरवर्षी हजारो मुस्लिम बांधव ‘उमरा’ या धार्मिक विधीसाठी सौदी अरेबियात जातात. ‘उमरा’साठी सौदी अरेबियात गेलेले महाराष्ट्रातील अनेक मुस्लिम बांधव तेथेच अडकून पडल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी माहिती दिली आहे.
सौदी अरेबियात अडकलेल्या या मुस्लिम बांधवांना पुन्हा भारतात आणण्यासाठी राज्य अल्पसंख्याक आयोगाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, यंदा 500 पेक्षा अधिक टूर ऑपरेटर्सनी ‘उमरा’ या धार्मिक विधीसाठी यात्रेकरूंना सौदी अरेबियात पाठवले आहे. मात्र, अचानक युद्ध सुरू झाल्यामुळे हे मुस्लिम बांधव सौदी अरेबियात अडकले आहेत. त्यांना मदत मिळवून देण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत. दरवर्षी रमजानच्या काळात खासगी टूर ऑपरेटर्सच्या मदतीने हे मुस्लिम बांधव सौदी अरेबियाला जातात. यंदा 500 पेक्षा अधिक टूर ऑपरेटर्सनी ‘उमरा’ या धार्मिक विधीसाठी यात्रेकरूंना सौदी
अरेबियात पाठवल्याची माहिती समोर येत आहे. ही संख्या एक लाखाच्या आसपास असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नोकरी आणि शिक्षण या दोन प्रमुख कारणांसाठी भारतातील जवळपास 97 लाख लोक आखाती देशांमध्ये राहत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. यात सर्वाधिक म्हणजे सुमारे 30 लाख भारतीय संयुक्त अरब अमिराती म्हणजे दुबई, कतार, अबुधाबी, दोहा आणि कुवेतमध्ये राहत आहेत. सौदी अरेबियात 27 लाख, कतारमध्ये 8 लाख, ओमानमध्ये 1.50 लाख भारतीय वास्तव्य करून आहेत. तसेच, अन्य आखाती देशांत सुमारे 30 लाख भारतीय आहेत.
या भारतीयांच्या सुरक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी तेथील सरकार-प्रमुखांशी संवाद साधला.