

भिवंडी : महाराष्ट्रात गाजत असलेल्या टीईटी पेपरफुटी प्रकरण उघडकीस आल्यानंतर १३ दिवसानंतर आग्रा येथून दोघा जणांना ताब्यात घेतल्याने या मध्ये आता पर्यंत अटक आरोपींची संख्या १२ वर पोहचली आहे. गुरुवारी भिवंडी पोलिसांनी या गुन्ह्यात पवन यादव वय ४० आणि हरिओम सिंग पानु वय २८ दोघे रा.आग्रा अशा दोघा जणांना ताब्यात घेतले.
यांसह या गुन्ह्यातील ९ जुलै पर्यंत पोलिस कोठडी असलेल्या सोनूकुमार सिंह, मिथुनकुमार सिंह,कपिल कृष्णा दहिया व संजयकुमार सुरेशचंद्र शर्मा,बाबुलाल नारायणसिंह कुशवाह,पुरनचंद माहौर उर्फ निकी अशा सहा जणांना भिवंडी अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने नव्याने अटक केलेले आरोपी पवन यादव व हरिओम सिंग पानु यांना सोमवारी १३ जुलै पर्यंत तर कपिल कृष्णा दहिया व संजयकुमार सुरेशचंद्र शर्मा यांना शनिवार ११ जुलै पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आल्याची माहिती या गुन्ह्यातील आरोपींचे वकील अँड. शैलेश गायकवाड यांनी दिली आहे.
यामधील अटक आरोपी पवन यादव हा मुख्य फरारी आरोपी बिजेंद्र गुप्ता याचा मित्र आहे. हरिओम सिंग पानु याने बिजेंद्र गुप्ता यास विमान तिकीट काढून दिल्याचा वहिम आहे. तर ९ जुलै पर्यंत पोलिस कोठडी असलेल्या सोनूकुमार सिंह, मिथुनकुमार सिंह,बाबुलाल नारायणसिंह कुशवाह, नरेशकुमार पुरनचंद माहौर उर्फ निकी यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. दीड कोटी रुपयांना पेपर विक्री करण्याचा त्यांचा डाव होता. या रॅकेटचे धागेदोरे अनेक राज्यांमध्ये पसरले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान या प्रकरणाचे धागेदोरे बिहार, हरियाणा, दिल्ली तसेच उत्तर प्रदेशपर्यंत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून या प्रकरणातील नेटवर्कचा शोध घेतला जात आहे.