

ठाणे : महाराष्ट्रातील सहा राज्यसभेच्या जागांची मुदत एप्रिलमध्ये संपत असून यात रायगडमधील खासदार धैर्यशील पाटील, शरद पवार, रजनी पाटील, प्रियांका चतुर्वेदी, रामदास आठवले, फौजिया खान, भागवत कऱ्हाड या सदस्यांचा त्यामध्ये समावेश आहे.
भाजपच्या दोन खासदारांची मुदत संपत असून त्यांना यावेळी तीन जागा मिळणार आहेत. शिवसेनेच्या कोट्यातील प्रियांका चतुर्वेदी यांची मुदत संपत असल्याने शिवसेनेला त्यांना पुन्हा निवडून आणायचे असेल तर काँग्रेसची मदत लागणार आहे. मात्र, महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरू असल्याने प्रियांका चतुर्वेदींबाबत सस्पेन्स आहे.
भाजपच्या कोट्यातून रामदास आठवले पुन्हा खासदार होतील. धैर्यशील पाटील आणि भागवत कऱ्हाड यांच्याबाबत भाजप काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे. आठवले केंद्रात मंत्री असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातून एका सदस्याची निवड होऊ शकते. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेनेला यावेळी एक जागा मिळणार असून त्यांच्याकडून रामदास कदम यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.