ठाणे; पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या राजकारणातले वातावरण रोजच गढूळ होत चालले आहे. आपण कोण माणसे निवडून देतो आहोत? कोणती माणसे आपल्यावर राज्य करत आहेत? त्यांची काय लायकी आहे? अशा माणसांसमोर आपली गान्हाणी घेवून जाण्यात काय अर्थ आहे? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी करत कवी, साहित्यिकांनी राज्यातील सद्य राजकीय स्थितीवर आपले भाष्य करावे, असे आवाहन केले.
राज ठाकरे रविवारी हे मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाप्रसंगी ठाण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. राजकारणातले वातावरण एवढे गढूळ होत चालले आहे की आपण पुढच्या पिढ्यांना काय सांगणार आहोत, अशी खिन्नता त्यांनी व्यक्त केली. इंग्लडला शेक्सपिअरचे पर त्यांनी किती जतन करून ठेवले आहे, आपल्याकडे इतकी विद्वान, प्रतिभावान माणसे होती. आहेत, पण आपल्याकडे एक संमेलन भरते, त्यात भाषणं होतात, त्यापलीकडे काही घडत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
आपल्यावर सव्वाशे वर्षे राज्य करणाऱ्यांना आपले साहित्य किती सकस आहे, हे कळण्यासाठी ते अनुवादित होण्याची गरज आहे, असे चांगले अनुवादक असतील, त्यांनी माझ्याकडे संपर्क साधावा, असे आवाहनही ठाकरे यांनी केले. साहित्याची इतर भाषांमध्ये अदान – प्रदान होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली