

ठाणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर वेगवान वादळामध्ये झालं असून, या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रासह देशाला पावसानं झोडपून काढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस सुरू असून, या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.
दरम्यान अजूनही धोका टळला नसून, आता भारतीय हवामान विभागाकडून पुन्हा एकदा हाय अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता हळूहळू चक्रीवादळात बदलत आहे. हे चक्रीवादळ उत्तर पश्चिमेच्या किनार्याकडे वेगाने सरकत आहे. सध्या या चक्रीवादळाची गती प्रति तास 63 किमी एवढी नोंदवण्यात आली आहे. मात्र हळुहळु या चक्रीवादळाची गती वाढवून ती प्रति तास 75 किमी पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.
हे चक्रीवादळ आज मध्यरात्री ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनार्याला धडकण्याची शक्यता आहे. या काळात या वार्याचा वेग ताशी 75 किमी एवढा असणार आहे. त्यानंतर पुढील तीन दिवसांमध्ये या वादळाचा वेग कमी होईल असेही हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार या वादळामुळे पुढील पाच दिवस अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, बिहार, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
ओडिशामध्ये पावसाचा जोर वाढणारदरम्यान ओडिशामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे, पावसामुळे राज्यात मोठे नुकसान झाले आहे. आजही ओडिशामधील जवळपास सर्वच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेच आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.