

कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 20 नगररसेवक बिनविरोध निवडून आहेत. या प्रकरणी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मामा पगारे यांनी कल्याणच्या वरिष्ठ दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या प्रकरणी न्यायालयाने बिनविरोध निवडून आलेल्या 20 नगरसेवकांसह निवडणूक आयोगाला नोटिस बजावली आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी 8 जूनला होणार असल्याची माहिती याचिकाकर्त्याचे वकिल उजैर नजे यांनी दिली आहे.
वकील नजे यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाचे 2018 सालचे परिपत्रक आहे. या परिपत्रकानुसार एखाद्या प्रभागात नोटाला 50 टक्के मते पडली. तर त्या प्रभागात फेर निवडणूक घेण्यात यावी. त्याचबरोबर 2002 साली आयोगाचा असा निर्णय होता की, एखाद्या प्रभागात एकाच उमेदवाराचा अर्ज प्राप्त झाला तर त्याठिकाणी त्या एकमेव उमेदवाराला बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करता येत होते.
2002 सालानंतर हा नियम बदलला. एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाला तर त्याठिकाणी त्या उमेदवाराला बिनविरोध घोषित करता येत नाही. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकीत भाजपचे 15 आणि शिंदे सेनेचे 5 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. या 20 नगरसेवकांची बिनविरोध निवड रद्द करण्यात यावी.
त्याठिकाणी पुन्हा नव्याने फेर निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्ते पगारे यांनी कल्याणच्या वरिष्ठ दिवाणी न्यायालयाकडे केली आहे. वास्तविक पाहता निवडणूकीचा निकाल लागल्यावर 10 दिवसांच्या आत निवडणूक प्रक्रिये संदर्भात याचिका दाखल करता येते.
मात्र पगारे यांना याचिका दाखल करण्यास 78 दिवसांचा विलंब झाला आहे. हा विलंब न्यायालयाने माफ करीत त्यांच्या याचिकेची दखल घेत20 नगरसेवकांसह निवडणूक आयोगाला न्यायालयाने नोटिस बजावली आहे.