

डोंबिवली : कल्याणमधील अर्णव खैरे या विद्यार्थ्याने जीवन संपवल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपा आणि शिवेसना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अर्णवच्या कुटुंबांची भेट घेतली. भाषा वादामुळे अशी दुर्दैवी घटना घडल्याचे भाजपाचे म्हणणे आहे. तर राजकारण न करता अर्णवच्या कुटुंबियांना न्याय कसा मिळेल यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे अशी प्रतिक्रिया शिंदे गटाने व्यक्त केली आहे. तर भाजपाच याचे राजकारण करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
अर्णव खैरे हा कल्याणमध्ये तिसगांव नाक्यावर असलेल्या सहजिवन वसाहतीत राहत होता. त्याने मंगळवारी सायंकाळी घरात गळफास घेऊन जिवनत्याग केला. मुलुंड येथील केळकर कॉलेजमध्ये शिक्षण घेणारा अर्णव मंगळवारी सकाळी कल्याणहून रेल्वेने मुलुंडला निघाला होता. लोकलमध्ये गर्दी होती. गर्दीत त्याने त्याच्या पुढे असलेल्या प्रवाशांना आगे सरको...असे म्हणाला. या कारणावरुन अर्णव याला चार-पाच जणांनी दम दिला.
मराठी बोलण्यास लाज वाटते का ? असे बोलून अर्णवला मारहाण केली. या घटनेचा जबर मानसिक धक्का अर्णवला बसला. मुलुंडला कॉलेजकडे न जाता ठाण्याला उतरुन घरी परतला. घरी येऊन गळफास घेतला. या घटनेवर भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी ट्वीट केले आहे. अर्णवचा फोटो ट्वीट करत ठाकरे बंधूवर टिका केली आहे. हे पाप कुठे फेडणार ? असे म्हटले आहे. त्यानंतर या घटनेवरुन राजकारण तापले आहे.
शुक्रवारी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख निलेश शिंदे यांनी खैरे कुटुंबियांची भेट घेतली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी फोनवरुन खैरे कुटुंबियांशी संवाद साधला. तर अर्णव प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, असे पोलिसांना सूचना दिल्याचे त्यांनी खैरे कुटुंबीयांचे सांत्वन करताना सांगितले.
याच दरम्यान भाजपाचे नरेंद्र सूर्यवंशी यांनी खैरे कुटुंबियांची भेट घेतली. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अर्णवला मारहाण करणारे मराठीच होते. भाषिक वादामुळे अशा दुर्दैवी घटना घडतात. ही वस्तूस्थिती आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी अर्णवने आत्महत्या केल्याची ही घटना दुर्दैवी आहे. सरकार तुमचे आहे, तर या प्रकरणात अद्याप गुन्हा का दाखल झाला नाही? असा संतप्त सवाल मनसेच्यावतीने उपस्थित करण्यात आला आहे.
तपास चक्रांना वेग
अर्णवला दमदाटी आणि मारहाण केल्याचा प्रकार कल्याण ते ठाणे रेल्वे स्थानकांदरम्यान घडला आहे. मात्र तो नेमका कोणत्या हद्दीत घडला ? याचा चौकस तपास करण्यासाठी कल्याण, डोंबिवली आणि ठाणे लोहमार्ग पोलिसांनी तपास चक्रांना वेग दिला आहे. ज्यांच्यामुळे अर्णवने टोकाचे पाऊल उचलले, त्याला जीवन करण्यास प्रवृत्त केले त्या चार-पाच जणांना गुप्तहेरांसह उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस तपास करत आहेत.