

सापाड : योगेश गोडे
कल्याण शहरातील वाहतूककोंडी आणि वाढत्या नागरी गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेला कल्याण स्कायवॉक हा प्रवाशांसाठी महत्वाचा दुवा मानला जात होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या स्कायवॉकवर अनधिकृत फेरीवाल्यांचा मोठ्या प्रमाणावर ताबा वाढला असून, त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर आता एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
अनधिकृत फेरीवाल्यांना स्कायवॉकवर बसविण्यासाठी पालिका अधिकारी स्वतः पावत्या फाडून देत असल्याचा व्हिडिओ समोर आला असून ते सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचे नवे दर्शन घडत असल्याची नागरिकांत चर्चा आहे.
रेल्वे स्टेशन परिसरातील गर्दी टाळण्यासाठी आणि प्रवाशांना सोयीस्कर मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी स्कायवॉकची उभारणी करण्यात आली होती. परंतु आज स्थिती अशी आहे की स्कायवॉकवर दुकाने, स्टॉल, भाजीविक्रेते, आणि विविध प्रकारचे फेरीवाले बेकायदेशीरपणे बसलेले दिसतात. सकाळी आणि संध्याकाळी प्रवाशांची प्रचंड वर्दळ असताना या फेरीवाल्यांमुळे पादचारी मार्ग अरुंद होतो आणि अपघाताची शक्यता वाढते.
विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. स्थानिक नागरिक आणि काही सामाजिक संघटनांनी पुराव्यांसह असा दावा केला आहे की पालिका अधिकारी स्वतः स्कायवॉकवर बसलेल्या फेरीवाल्यांकडून पैसे घेत पावत्या फाडत आहेत. पावत्या मिळाल्याने फेरीवाले स्कायवॉकवरील तो जागा कायदेशीर असल्याप्रमाणे व्यापत आहेत, ज्यामुळे त्यांना हटविण्यासाठी चालवली जाणारी कारवाई देखील निष्फळ ठरत आहे.
मूळात स्कायवॉकवर कोणत्याही प्रकारचे स्टॉल, फेरीवाले किंवा व्यावसायिक उपक्रमांना परवानगी नाही. तरीही पावत्या दिल्या जात असल्याने यात पालिका अधिकाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचे दिसून येते. नागरिकांच्या मते, पालिका अधिकाऱ्यांचा हात असेल तरच स्कायवॉकवरील अवैध धंदा इतक्या मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. स्कायवॉकवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रश्न गंभीर आहे.
गर्दीच्या वेळी फेरीवाल्यांचे दुकान लावल्यामुळे प्रवाशांची झुंबड उडते. काही वेळा वस्तूंच्या ढिगाऱ्यावरून घसरून पडण्याचेही प्रकार झाले आहेत. स्कायवॉकवरील प्रकाशयंत्रणाही फेरीवाल्यांच्या आडोशामुळे आंशिकपणे झाकली जाते, ज्यामुळे रात्रीच्या वेळी असुरक्षिततेची भावना अधिक वाढते.
स्कायवॉकवर जागोजागी कचरा साचून दुर्गंधी पसरत आहे. पादचाऱ्यांना स्कायवॉकवरून फेरीवाल्यांमुळे अडथळा निर्माण होऊन गर्दी वाढत आहे. विशेष म्हणजे अनधिकृत फेरीवाले स्कायवॉकवर काही ठिकाणी अवैध वीज वापर करत असून शासनाचा नुकसान करत आहेत.
त्याच बरोबर स्कायवॉकवर अनधिकृत फेरीवाल्यांमुळे आपत्कालीन परिस्थितीत मार्गात अडथळले निर्माण होऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता दिसून येत आहे. त्याच बरोबर स्कायवॉकवरील वारांगणा, गर्दुल्ले आणि चरसी नागरिकांमुळे महिलांच्या सुरक्षितताव ऐरणीवर आली आहे. हे सर्व प्रश्न वारंवार उपस्थित होत असूनही प्रशासन त्याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
महापालिकेने तातडीने कठोर पावले उचलण्याची गरज
स्कायवॉकवरील कायमस्वरूपी ‘नो-फेरीवाला झोन’ची कडक अंमलबजावणी करून स्कायवॉकवर सीसीटीव्ही निरीक्षण वाढवणे, स्वच्छता आणि सुरक्षा उपायांची तातडीने अंमलबजावणी करणे, फेरीवाल्यांसाठी पर्यायी जागेची सोय करून देणे, कल्याणकरांच्या सुरक्षिततेला अग्रक्रम देण्यासाठी हे सर्व उपाय तत्काळ राबविणे आवश्यक असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे. त्यामुळे कल्याण स्कायवॉक हा प्रवाशांसाठी जीवनवाहिनी असताना, त्याच स्कायवॉकला भ्रष्टाचाराचा बाजार मांडण्यात येत असल्याचे दृश्य अत्यंत धक्कादायक आहे.
अनधिकृत फेरीवाल्यांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करणारे अधिकारी ही परिस्थिती अधिक गंभीर करतात. प्रवाशांच्या सुरक्षेला होणारा धोका, प्रशासनाची उदासीनता आणि वाढता भ्रष्टाचार या सर्वांवर महापालिकेने तातडीने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा प्रश्न लक्षात घेता हा मुद्दा तात्काळ सोडविणे अत्यावश्यक आहे. अन्यथा ही परिस्थिती अशीच राहिली तर प्रवाशांचा उद्रेक होईल. आणि परिस्थिती हाताबाहेर जाईल. असे सांगण्यात येत आहे.