

ठाणे : पाण्यामुळे ठाणेकरांची आणखी वाईट अवस्था होणार आहे. मुंबईच्या तोंडातून 2002 मध्ये शाई धरण काढून ठाण्याच्या नावावर मी केले होते. मात्र टक्केवारीच्या लफड्यात शाई धरण रखडल्याने ठाणेकरांचे मोठे नुकसान झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) चे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधारी शिवसेनेवर केला आहे.
तसेच मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांना मी धरण देतो, हे पहिले वाक्य उच्चारले पाहिजे होते. धरण बांधून ठाणेकरांची तहान भागवली आणि पुढची शंभर वर्ष ठाणेकर माझे नाव काढतील, अशी मोठी सुवर्णसंधी एकनाथ शिंदेंनी हातून घालवली, अशी खंतही आव्हाड यांनी पत्रकार परिषेदेत व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज ठाणे महापालिकेतील पत्रकार कक्षाला भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर अध्यक्ष मनोज प्रधान, गट नेते अभिजित पवार, नगरसेवक सुधीर भगत उपस्थित होते. त्यावेळी ठाण्यातील पाणीटंचाई, वृक्ष तोड, रखडलेली मेट्रो आदी समस्यांच्या प्रश्नांची त्यांच्यावर सरबत्ती केली.
आ. आव्हाड यांनी राज्य सरकारकडून ठाणेकरांच्या विकासात्मक कामाची आता अपेक्षा उरलेली नसल्याची खंत व्यक्त केली. ठाणेकरांना भेडसावत असलेली पाणी टंचाई आणखी तीव्र होणार आहे.
पॉड टॅक्सिपेक्षा ठाणेकरांना पाणी महत्वाचे आहे. मविआचे सरकार असताना मी मुंबई महापालिकेच्या नावावर असलेले शाई धरण हे ठाणेकरांसाठी आणले होते. मात्रटक्केवारीच्या नादात टेंडर काढले नाही, धरण रखडल्याचीखंत आव्हाड यांनी व्यक्त केली.
ठाण्यात होतेय तीन हजार झाडांची कत्तल
ठाण्यात तीन हजार झाडांची कत्तल होत असताना ठाणेकर शांत कसे राहू शकतात? याबाबत आश्चर्य व्यक्त केले. येऊरचा ऱ्हास होत आहे. 42 बिबटे होते. आता 20 शिल्लक नाहीत. आपल्या निसर्ग सौंदर्याची काळजी नाही, भविष्यात झाडेच शिल्लक राहणार नाहीत, असे असतानाही ठाणेकर उघड्या डोळ्याने निमूटपणे पाहत आहेत, असे आव्हाड म्हणाले.