

Dombivli Thackeray Shiv Sena
डोंबिवली : एकीकडे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या पळवापळवीवरून भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेत कलगीतुरा रंगल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद वाढल्याचे गुरूवारी (दि.४) दिसून आले. सामाजिक कार्यकर्ते वैशाली म्हात्रे आणि किरण म्हात्रे यांच्यासह शेकडो डोंबिवलीकरांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करून राजकीय गोटात एकच खळबळ उडवून दिली.
डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते किरण म्हात्रे, विकास पोटे, वैशाली म्हात्रे, स्वप्निल भोईर, अनिरूद्ध भोईर, विक्रम भोईर, शिवानी नाकती, प्रणाली गुरव, तुकाराम तेजस, बापू तेजस, प्रांजल तेजस यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. कल्याण-डोंबिवलीचे जिल्हाप्रमुख तात्या माने यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शिवबंधन सोहळ्याला पश्चिम शाखेत उत्साहात सुरूवात झाली. यावेळी शिवसैनिकांनी सुशिक्षितांची सांस्कृतिक नगरी डोंबिवली आणि ऐतिहासिक नगरी कल्याणवर भगवा झेंडा फडकणारच, असा निर्धार व्यक्त करत जल्लोषपूर्ण घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
पक्षाचा प्रवेश सोहळ्यात सहभागी झालेल्या शिवसैनिकांनी आगामी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्ष प्रवेशाच्या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशांनुसार जिल्हाप्रमुख तात्यासाहेब माने, उपजिल्हाप्रमुख योगेंद्र भोईर, पश्चिम डोंबिवलीचे शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे, शहर संघटक प्रियांका विचारे, उपशहर संघटक निशा रेडीज, लक्ष्मीताई कांबळी, विभाग संघटक रेश्मा सावंत, शाखा संघटक अर्चना पाटील, विधानसभा अधिकारी आदित्य पाटील, उपशहरप्रमुख संजय पाटील, विभागप्रमुख राजेंद्र सावंत, श्याम चौगुले यांच्यासह महिला आणि पुरूष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी जिल्हाप्रमुख तात्यासाहेब माने यांनी उपस्थितांशी संवाद साधला. सद्या शिंदे गट आणि भाजपामध्ये पक्षप्रवेशावरून स्पर्धा सुरू असली तरी आमच्या पक्षात सुशिक्षित, डॉक्टर, आयएएसची तयारी करणारे तरूण, उच्चशिक्षित स्वतःहून येत आहेत. डोंबिवली सुशिक्षित आणि सुसंस्कृत शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे आमच्या नेतृत्वावरचा विश्वास वाढत आहे. आमच्या पदाधिकाऱ्यांना त्रास देण्याचे प्रयत्न झाले. तरीही आम्ही संयमी आहोत. कार्य आणि कर्तृत्वावर विश्वास ठेवूनच अनेक जण पक्षात प्रवेश करत आहेत. जोपर्यंत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर निष्ठावंत शिवसेनेचा भगवा फडकत नाही, तोपर्यंत एकही शिवसैनिक स्वस्थ बसणार नसल्याचा विश्वास जिल्हाप्रमुख तात्यासाहेब माने यांनी व्यक्त केला.
एकमेकांची माणसे फोडल्याने त्यांच्यातील फूट वाढतच जाणार - जिल्हाप्रमुख तात्यासाहेब माने
सध्याच्या शिवसेना-भाजपा युतीतील वाद आणि अंतर्गत फोडाफोडीवर टीका करताना तात्यासाहेब माने म्हणाले, त्यांची मैत्री ही कपटी असून ती फार काळ टिकणारी नाही. एकमेकांची माणसे फोडल्याने त्यांच्यातील फूट वाढतच जाणार. दुसरीकडे आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुशिक्षितांची डोंबिवली आणि ऐतिहासिक कल्याण नगरीवर भगवा फडकवणारच. स्वार्थी लोक टिकत नाहीत, निस्वार्थी एकत्र आले की त्यांच्यात फूट पडत नाही, असेही जिल्हाप्रमुख माने म्हणाले.