

Trees Uprooted Badlapur
बदलापूर (पंकज साताळकर) : बदलापूर शहरात बुधवारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. इतकेच नव्हे, तर गेल्या दोन दिवसांपासून पावसासोबत 20 ते 30 किलोमीटर प्रतितास वेगाने वारेही वाहत आहेत. या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. बुधवारी रात्री बदलापूर गावात झाडाच्या फांद्या कोसळल्याने काही वाहनांचे नुकसान झाले.
या वेगवान वाऱ्यामुळे बदलापूर पूर्व परिसरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा बुधवारी रात्रीपासून खंडित झाला आहे. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी वीजवाहिन्यांवर झाडे पडल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर शहरातील अनेक भागांत मोबाईल नेटवर्कही रात्रीपासून विस्कळीत झाले आहे. मोबाईल चार्जिंग आणि नेटवर्कच्या समस्येमुळे अनेक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अनेकांचे मोबाईल संपर्क क्षेत्राबाहेर लागत आहेत.
गुरुवारी सकाळी साडेअकरानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी अनेक भागांत झाडे पडल्यामुळे वीजपुरवठा अद्याप पूर्णपणे सुरळीत झालेला नाही. त्यामुळे मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्याचा बदलापूर शहराच्या जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून, शहरातील दैनंदिन हालचाली मंदावल्या आहेत.
बदलापूर शहरात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस व वेगवान वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. झाडे पडण्याच्या घटना, वीजपुरवठा खंडित होणे तसेच मोबाईल नेटवर्क विस्कळीत झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.