

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने विविध प्रभागातील फेरीवाल्यांचे प्रस्थान दिसून येत आहे. दरम्यान अशा फेरीवाल्यांच्या विराेधात कारवाई केली जात आहे. दरम्यान ही कारवाई तातडीने थांबविण्याची मागणी होत आहे.
कल्याण येथील ग प्रभागात फेरीवाल्यांच्या विरोधातही कारवाई सुरू असल्याने शहर फेरीवाला समितीचे सदस्य भालचंद्र पाटील आणि कष्टकरी हॉकर्स व भाजी विक्रेता युनियनचे अध्यक्ष बबन कांबळे यांच्या शिष्टमंडळाने सहाय्यक आयुक्त जयराम शिंदे यांची भेट घेतली. यावेळी फेरीवाल्यांनी निवेदन सादर केले. फेरीवाल्यांच्या विरोधातील कारवाई स्थगित करण्यात यावी, अन्यथा येत्या १५ ऑगस्टला मोर्चा काढण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
फेरीवाले स्टेशन परिसरापासून १५० मीटरच्या अंतरापासून दूरवर फेरीचा व्यवसाय करीत आहे. तरी प्रशासन त्यांच्या विरोधात कारवाई करून त्यांचा माल जप्त करते. महापालिकेने २०१४ साली फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले. त्यावेळी महापालिका हद्दीत ९ हजार ८३४ फेरीवाले होते. सर्वेक्षण झालेल्या फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी जागा निश्चित करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची होती. आज २०२६ साल सुरू आहे. तरीही त्यांची अंमलबजावणी केलेली नाही.
फेरीवाल्यांच्या पोटाचा प्रश्न उपस्थित होत असून ही कारवाई थांबविण्याची मागणी होत आहे. फेरीवाल्यांच्या विरोधातील कारवाई त्वरित थांबविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.अन्यथा १५ ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.
कारवाई सुरूच ठेवणार...
या संदर्भात सहाय्यक आयुक्त जयराम शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ग प्रभागातील सर्व रस्ते १२ मीटर रुंदीचे आहेत. आधीच रस्ते कमी रुंदीचे आहेत. अस्तित्वात असलेल्या अरुंद रस्त्यावर दुभाजक नाहीत. त्यामुळे या रस्त्यालगत फेरीवाल्यांनी व्यवसाय केल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. पादचारी रस्त्याने धड चालू शकत नाही. त्यामुळे ग प्रभागात फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई सुरूच ठेवली जाणार आहे.