

ठाणे: घोडबंदर परिसरातील पाणीटंचाईचा प्रश्न पुन्हा एकदा महासभेत ऐरणीवर आला. कमी दाबाने आणि अपुऱ्या प्रमाणात होणारा पाणीपुरवठा, टँकरवर नागरिकांची वाढती निर्भरता, बंद पम्प, रखडलेल्या पाण्याच्या टाक्या आणि पाणी उपलब्धतेचा विचार न करता दिल्या जाणाऱ्या बांधकाम परवानग्या यावरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. पाणीप्रश्न तातडीने सोडविला नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही सदस्यांनी दिला.
घोडबंदर परिसरातील पाणीप्रश्न मांडताना अनिता ठाकूर यांनी नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असल्याचे सांगितले. अनेक भागांत कमी पाणी येत असून, हा प्रश्न नागरिकांसाठी अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कमळ चौधरी यांनी पाण्याची टाकी असूनही त्यात पाणी नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. पम्पही काम करत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. हा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास पुढील महासभेत आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
यज्ञा भोईर यांनी पाणी समस्या अद्याप कायम असल्याचे सांगत प्रशासनाकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप केला. नागरिकांना पाणी कधी मिळणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, पाइपलाइनच्या कामांसाठी रस्ते खोदले जात असल्याचा मुद्दा नारायण पवार यांनी उपस्थित केला. संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे ठरले असतानाही त्यालाच पुन्हा कामे का दिली? त्याच्यावर कारवाई का केली जात नाही, असा सवाल त्यांनी प्रशासनाला केला.
श्रीनगरमधील पाण्याच्या टाकीचा प्रश्नही महासभेत गाजला. जुनी टाकी पाडून नवीन टाकी उभारण्यासाठी निविदा काढण्यात आली. मात्र, दीड वर्ष उलटूनही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही, अशी माहिती मनोज शिंदे यांनी दिली. संजय भोईर यांनी शहरातील विकासाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
ज्या भागात पाणी उपलब्ध नाही, तेथे विकासकांना इमारती उभारण्याची परवानगी दिली जाते. बांधकाम आराखडा मंजूर करताना पाण्याचा स्रोत कुठे आहे, याचा विचार केला जातो का? पाणीपुरवठ्याचे नियोजन कुठे आहे? असा सवाल त्यांनी केला. सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी प्रभागनिहाय पाणीपुरवठ्याच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन दिले. सदस्यांनी मांडलेल्या सूचनांवर कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पाणीपुरवठ्याचे नियोजन कागदावरच?
शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असताना त्यासाठी आवश्यक पाणीपुरवठ्याचे नियोजन होत नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. त्यामुळे एकीकडे नव्या इमारती उभ्या राहत असताना दुसरीकडे जुन्या वस्त्यांतील नागरिकांना टँकरच्या पाण्यासाठी धाव घ्यावी लागत आहे. पाण्याच्या टाक्या आणि पाइपलाइनची रखडलेली कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी महासभेत करण्यात आली.