

सापाड : कल्याण-डोंबिवली शहरात एकीकडे पावसाचा जोर वाढत असताना दुसरीकडे अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढिगारे साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक दिवसांपासून कचरा उचलला जात नसल्याने पावसाच्या पाण्यात भिजलेला कचरा कुजण्यास सुरुवात झाली असून, कुजलेल्या कचऱ्यातून परिसरात दुर्गंधी पसरत आहे.
परिणामी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना अक्षरशः नाकावर हात ठेवून मार्गक्रमण करावे लागत आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांच्या भोवती माशांचा आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांत आरोग्याबाबत चिंता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेकडून शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असतानाही प्रत्यक्ष शहरातील रस्ते, मोकळी मैदाने, पदपथ आणि वाहतूक मार्गालगत कचऱ्याचे ढिगारे दिसत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पावसाळ्यात कचरा वेळेत उचलला गेला नाही तर त्यात ओलावा निर्माण होऊन कुजण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते. कल्याण-डोंबिवलीतील काही भागांमध्ये सध्या याच परिस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अन्नपदार्थांचे अवशेष, भाजीपाला, प्लास्टिक, कागद, कचरा व टाकाऊ वस्तू अनेक दिवस एकाच ठिकाणी पडून राहिल्याने त्यातून दुर्गंधी निर्माण होत आहे.