

भिवंडी : भिवंडीतून तीन दिवसांत चार अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये तीन मुलींसह एका मुलाचा समावेश आहे. यातील पहिल्या घटनेत नारपोली पोलीस ठाणे हद्दीतील 13 वर्षीय मुलीला 2 फेब्रुवारी रोजी कोणीतरी अज्ञात इसमाने मुलीच्या अज्ञातपणाचा फायदा घेवून फूस लावून पळवून नेल्याचा संशय तिच्या वडिलांनी व्यक्त केला आहे.
याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत अशाच प्रकारे 15 वर्षीय मुलालाही कोणीतरी फूस लावून त्याच्या अज्ञातपणाचा फायदा घेऊ न 2 फेब्रुवारी रोजी पळवून नेल्याची तक्रार नारपोली पोलिसांत देण्यात आली असून अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे.
तिसऱ्या घटनेत 3 फेब्रुवारी रोजी 14 वर्षीय मुलगी ही किराणा दुकानातून सकाळी 9 वाजताच्या सुमारास घरी नाष्टा करण्यासाठी गेली असता ती दुकानात परतलीच नाही. तिचा बराच वेळ शोध घेऊनही ती न सापडल्याने अखेर मुलीचे कोणीतरी फूस लावून अपहरण केल्याच्या संशयावरून कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपहरणाचा गुन्हा दाखल
मुले बेपत्ता होण्याच्या चौथ्या घटनेत परिसरातील एक पंधरा वर्षीय मुलगी घरात मेडिकल मध्ये औषधे घेण्यासाठी जाते असे सांगून घरातून 4 फेब्रुवारी रोजी गेली असता ती घरी परतलीच नसल्याने तिच्या वडिलांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.