

टिटवाळा: राज्यात निकृष्ट औषधांचा मुद्दा विधानसभेत गाजूनही आरोग्य यंत्रणेतील ढिसाळ कारभारावर कोणताही लगाम बसलेला नसल्याचे आणखी एका गंभीर घटनेतून समोर आले आहे. कल्याण तालुक्यातील गोवेली ग्रामीण रुग्णालयात दहा महिन्यांच्या बाळाला मुदत संपलेले औषध देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
यापूर्वी अंबरनाथ तालुक्यातील वांगणी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिला रेणूका शिंदे यांना चुकीचे औषध देण्यात आले होते. या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या असंवेदनशील वर्तनामुळे वातावरण चांगलेच तापले होते.
‘एक गोळी घेतली असती तर काय बिघडलं असतं?’ अशा प्रकारचे बेजबाबदार वक्तव्य करत रुग्णांच्या भावनांशी खेळ करण्यात आला होता. हा मुद्दा आमदार मोहन मते यांनी विधानसभेत उपस्थित करताच आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर यांनी संबंधितांवर निलंबनाची कारवाई जाहीर केली होती आणि आरोग्य व्यवस्थेला शिस्त लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती बदलल्याचे कुठेही दिसत नाही.
कल्याण ग्रामीण भागातील एका दहा महिन्यांच्या बाळाला ताप व अंगावर पुरळ आल्याने त्याची आई गोवेली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. डॉक्टरांनी तपासणीनंतर औषधे लिहून दिल्यानंतर रुग्णालयातून ‘ओपीक्लेव’ हे औषध देण्यात आले. परंतु, हे औषध फेब्रुवारी 2026 मध्येच एक्सपायर झालेले असल्याचे एका जागरूक सामाजिक कार्यकर्तीच्या निदर्शनास आले. तिच्या सतर्कतेमुळे बाळाला ते औषध देण्यापासून थांबवता आले आणि मोठा अनर्थ टळला.
कारवाईचे संकेत
दरम्यान, ठाण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार यांनी या प्रकरणाची दखल घेत ‘हा प्रकार अत्यंत गंभीर असून दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नाही,’ असे स्पष्ट करत चौकशी व कारवाईचे संकेत दिले आहेत. वारंवार समोर येणाऱ्या अशा घटनांमुळे आरोग्य यंत्रणेवरचा विश्वास ढासळत असून, ‘रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई कधी होणार?’ असा संतप्त सवाल आता जनतेतून विचारला जात आहे.