

Rahul Gandhi vs Eknath Shinde
ठाणे : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना यापूर्वीच निवडणूक आयोगाने त्यांनी केलेल्या आरोपाबाबत पुरावे आणि प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु ते न करता केवळ आरोप करण्याचे काम ते करत आहेत. कर्नाटकातल्या अंलग मतदारसंघात जर मतचोरी झाली असती तर तिथे काँग्रेसचे आमदार भोजनाथ पाटील कसे निवडून आले असते, मग तिथे मतचोरी कुणी केली, भाजपने की काँग्रेसने असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
टेंभी नाक्याच्या नवरात्रौत्सवाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत राहुल गांधी, संजय राऊत आणि महाविकास आघाडीवर टीका केली.
लोकांमध्ये संभ्रम आणि लोकांची दिशाभूल करण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. जर त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी न्यायालयात ते जिंकतात तेव्हा राहुल गांधी आरोप करत नाही, ते हरतात तेव्हाच ते आरोप करतात. ईव्हीएम मशीन युपीए सरकारचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातच सुरू झाले, मग ती मतप्रक्रिया चुकीची आहे, असे राहुल गांधींना म्हणायचे आहे का? असा सवाल शिंदे यांनी केला.
कर्नाटक आणि तेलंगणात त्याचबरोबर महाराष्ट्रात लोकसभेच्या जागांवर विजय झाला, तेव्हा राहुल गांधी यांनी ईव्हीएम मशीनबाबत प्रश्न का उपस्थितीत केले नाहीत, ते जिंकतात तेव्हा ते शांत बसतात, पण हरले की ते मतदार याद्या, ईव्हीएम मशीन, निवडणूक आयोग अगदी न्यायालयावरही आरोप करतात, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.
मीनाताई ठाकरेच्या पुतळ्याच्या शाईफेक प्रकरणी संबंधितावर योग्य ती कारवाई होईल, पण या प्रकरणात काहींनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला, अशी खंत त्यांनी व्यक्त केले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटांचा महापौर असेल ,असे त्यांचे नेते सांगतात, या पत्रकारांनी उपस्थितीत केलेल्या प्रश्नांवर उत्तर देतांना, महाविकास आघाडीत आता दुसरे कुणीच नाही का, बेस्टच्या साध्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा कळली आहे. यातून त्यांनी बोध घ्यावा, मी मुख्यमंत्री असताना मुंबईत केलेली कामे, क्लस्टर, मेट्रो, स्वच्छता, आरोग्य अशा विषयात कामे केली आहेत. क्लस्टरच्या माध्यमातून आम्ही मुंबईतून बाहेर गेलेला मराठी माणूस आम्ही परत मुंबईत आणण्यास सुरवात केली आहे. लोकसभा, विधानसभेच्या पाठोपाठ महायुती मुंबई महापालिकेच्या निवडणुका जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीतील अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या आदेशाला दिलेल्या स्थगिती बाबत न्यायालयाने गुरूवारी दिलेल्या आदेशाबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, पुढील सुनावणीत आम्ही आमची बाजू मांडणार असल्याचे उत्तर दिले.
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या कामाच्या, कार्याची उंची मोजण्याचे पाप करू नये, त्यांनी आपले जीवन जनतेसाठी सर्मपित केले होते. दिघे यांची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर श्रध्दा होती, अशा कोत्या वृत्तीच्या लोकांना दिघे यांचे कार्य कळणार नाही, त्यांना दिघे यांच्या कार्याचा अभ्यास करावा लागेल, असा टोला शिंदे यांनी लगावला.