

डोंबिवली : महावितरणने स्मार्ट मीटरसाठी पाठवलेला एक मेसेज आणि डोंबिवलीच्या सोसायट्यांनी मीटर बॉक्सला लावले टाळे - हीच सध्या शहरातली चर्चा आहे. स्मार्ट मीटर सक्तीला नागरिकांचा तीव्र विरोध सुरू झाला असून, आता थेट मीटर बॉक्स सील करण्यापर्यंत पाळी आली आहे.
डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील नवसंकुल सोसायटीसह अनेक हाऊसिंग सोसायट्यांनी ठरवले आहे की, कितीही दबाव आला तरी स्मार्ट मीटर बसवून घ्यायचे नाही. त्यासाठी या सोसायट्यांनी शक्कल लढवली आहे. इमारतीच्या तळमजल्यावरील मीटर बॉक्सच्या ग्रीलला मोठे कुलूप लावले आहे. महावितरण किंवा अदानीचे कर्मचारी आले तरी मीटर बदलता येऊ नये, यासाठी ही व्यवस्था केली आहे. फक्त टाळेच नाही, तर या सोसायट्यांनी महावितरणला लेखी पत्रही दिले आहे. त्यात आमच्या इमारतीत स्मार्ट मीटर बसवू नये, अशी ठाम मागणी केली आहे.
सोसायट्यांचा हा पवित्रा पाहून महावितरण प्रशासनाची गोची झाली आहे. काही राजकीय संघटनांनीही स्मार्ट मीटर बसवण्याला जोरदार विरोध सुरू केला आहे. जर सर्वच हाऊसिंग सोसायट्यांनी असा टाळे प्रयोग केला तर महावितरणला स्मार्ट मीटर बसविणे अशक्य होणार असल्याची स्थिती आहे.
या पार्श्वभूमीवर सोमवारी डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील महावितरण कार्यालयात रहिवाशांनी अर्थात वीज ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. डोंबिवली शहर आणि २७ गावांतील ग्रामस्थ आपल्या व्यथा घेऊन आले होते. स्मार्ट मीटर सक्ती, एकसारखा खंडित होणारा वीजपुरवठा आणि भरमसाठ येणारी लाईट बिले या तीन मुद्द्यांवर रहिवाशांनी तेथील अधिकाऱ्यांसमोर संताप व्यक्त केला.
जरी लोकांचा विरोध होत असला तरी दबाव टाकून स्मार्ट मीटर बसविण्याचा सरकारचा निर्णय असल्याचे समजते. त्यामुळे जनतेत असंतोष वाढत चालला आहे. महावितरण प्रशासन आणि सरकार हा वाढता विरोध कसा हाताळणार, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सोसायट्यांचे टाळे तोडणार की ग्राहकांच्या मागणीला मान देणार, हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहणार असल्याचे या भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी सांगितले.