

ठाणे: मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडून चर्चा न करता महत्वाच्या विषयांना सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली जाते,चांगल्या प्रस्तावना आमचा विरोध नाही मात्र विषयांवर चर्चा न करण्याचे कारण काय? हिंमत असेल तर सभागृहात विषयांवर चर्चा करा असे थेट आव्हान शिवसेनेला उपमहापौर कृष्णा पाटील यांनी दिले आहे.
एकाच विषयाचे दोन प्रस्ताव करून या विषयाला मंजुरी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपपेक्षा विरोधकांनाच निधी जास्त दिला असून यामागे नेमकी मिलीभगत काय आहे असा आरोप देखील उपमहापौरांनी केला आहे. गेल्या चार महिन्यात सभागृहाच्या नियमांची पायमल्ली ही शिवसेनेकडूनच होत असल्याचे प्रतित्युर देखील उपमहापौर कृष्णा पाटील यांनी दिले आहे.
गेल्या आठवड्यात सभागृहात झालेल्या गोंधळानंतर भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या कारभारच सर्व लेखाजोखा आता भाजपच्या वरिष्ठ पातळीवर दिला आहे. यावर आता वरिष्ठ पातळीवर काय भूमिका घेतली जाणार आहे, या प्रतीक्षेत भाजपचे नगरसेवक आहेत.
मात्र दुसरीकडे शिवसेनेच्या या कारभाराच्या विरोधात उपमहापौर आणि भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक कृष्णा पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी कृष्णा पाटील यांच्यावर केलेल्या आरोपांना देखील त्यांनी प्रतित्युर दिले आहे.
आम्ही सभागृहाचे संकेत मोडले नसून तुम्हीच दोन मिनिटात कोट्यवधींच्या प्रस्तावना गोंधळात मंजुरी देत असाल तर आम्ही शांत बसायचा का ? आम्ही त्याला विरोध करायचा नाही का ? असा प्रश्न उपमहापौरांनी उपस्थित केला आहे. निलंबनाला आम्ही घाबरत असून आम्ही त्याला तयार आहोत, दोघेही जनतेसमोर जाऊया, जनता ठरवेल मग कोण चुकीचं आहे आणि कोण बरोबर आहे आतापर्यंत चार महासभा झाल्या.
मात्र यामध्ये भाजपची अहवेलना करण्यात आली. आमचा अजेंडा पारदर्शकतेचा अजेंडा आहे, मी सभागृहात केले ते योग्यच केले. 301 च्या विषयाला आमचा विरोध होता, तशी कल्पना देऊन मी खाली उतरलो,मात्र त्याच वेळी विषय मंजूर करून मी माझे आसन सोडून खाली आल्यावर राष्ट्रगीत सुरु केले जाते हे कोणते सभाशास्त्र आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. महासभेत दादोजी कोंडदेव क्रीडागृहातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल विस्तार प्रकल्पाच्या प्रस्तवाचा पर्दाफाश देखील उपमहापौरांनी केला.
राजीनामा देऊन जनतेपुढे जाऊया,जनताच ठरवेल
ठाणे महापालिकेची निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढतो. आम्ही सत्तेतून बाहेर पडावे असे शिंदे सेनेच्या नगरसेवकांचे म्हणणे असेल तर, मी राजीनामा देतो, तुम्ही पण राजीनामा द्या. पुन्हा निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा जनतेच्या दरबारात जाऊया.जनताच ठरवेल कोणाला निवडून द्यायचे असे खुले आव्हान देखील उमहापौर कृष्णा पाटील यांनी शिवसेनेला दिले आहे.