

कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात पाणी टंचाईची समस्या आहे. महापौरांच्या प्रभागातही पाणी टंचाई असल्याने त्यांचा सामना महापौरांना करावा लागत आहे. मोहिली जलशुद्धकरण केंद्रात रॉ वॉटर पंप बसविण्याचा आदेश एक वर्ष जुना आहे. तरी देखील पंप बसविण्यात दिरंगाई केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
यंदा जून महिना पूर्णपणे कोरडा होता. पाऊस लांबल्याने पाणी कपात लागू करण्यात आली होती. बारवी धरणातील पाणी साठयाचे नियोजन करण्यासाठी ही कपात लागू केल गेली. पाणी कपात लागू केल्याने अनेकांना मे महिन्यापेक्षा जास्त जून महि्न्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागला.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पार पडलेल्या महापालिकेच्या महासभेत सर्व पक्षीय नगरसेवकांनी पाणी टंचाईच्या विरोधात आवाज उठविला. त्याला दुजोरा देत खुद्द महापौर हर्षाली चौधरी यांनी त्यांच्या प्रभागातही पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे मान्य करीत पाणी टंचाई दूर करण्याचे आदेश दिले होते.
त्यासाठी ठोस स्वरुपाच्या आणि तातडीच्या उपाययोजना लवकर करण्यात येतील असे आश्वासन आयुक्त अभिनव गोयल यांनी महासभेत दिले होते. आयुक्तांनी आश्वासन दिले असले तरी त्याचा सोयीस्कर विसर महापालिकेच्या पाणी खात्याला पडला आहे.
दरम्यान जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जलमय स्थिती उद्धवली. उल्हास नदीच्या पाण्याने पातळी ओलांडल्याने महापालिकेचे मोहिली येथील जलशुद्धीकरण केंद्र पाण्याखाली गेले. ते सुरु करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी लागला. त्यानंतर मुख्य जलवाहिनी नादुरुस्त झाली. ती दुरुस्त करुन घेण्यात आली.
तरी देखील पाणी टंचाईची समस्या कायम आहे. महापौरांच्या प्रभागात पाणी टंचाईची समस्या तीव्र आहे. मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात एकूण नऊ पंप आहे. त्यापैकी ३ पंप हे रॉ वॉटरचे असून ६ पंप हे प्युअर वॉटरचे आहे. एक रॉ वॉटर पंप नादुरुस्त असल्याने तो बदली करण्यास मंजूरी दिली आहे.
१ कोटी २० लाख रुपये खर्चाचा हा रॉ वॉटर खरेदी करण्यात आला आहे. तो बसविण्याचे आदेशही देण्यात आले आहे. मात्र अभियंता अजय सुळेभावेकर यांच्याकडून चालढकल केली जात असल्याने पंप बदलण्याचे काम रखडले आहे. परिमाणी महापौरांच्या प्रभागातील नागरीकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. ही बाब स्वत: महापौरांनी देखील मान्य केली आहे.