

श्रीकृष्ण बाळ
महाड: महाड भोर मार्गावरील वरंधा घाटात दरडी कोसाळण्याचे सत्र काही केल्या थांबेना. ५ जुलै शुक्रवारी आणि ७ जुलै रविवारी पडलेल्या दरडींनंतर भोर हद्दीतील वारवंड ते उंबर्डे दरम्यानच्या रस्त्यावर ८ जुलैच्या रात्री चार ते पाच वेगवेगळ्या ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
रात्रीपासून वरंधा घाट वाहतुकीस पुन्हा पुर्णतः बंद करण्यात आला होता मात्र गेल्या तीन दिवसा पासून पाऊस थांबला असला तरी या ३० किमीचा मार्गवर अनेक ठिकाणी मातीचा सडा रस्त्यावर आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या मार्गवर प्रवास धोकादायक असला तरी अनेक लहान करा टेम्पो ट्रॅव्हलचा खुलेआम प्रवास सुरु असल्याचे वास्तववादी चित्र या मार्गवर पहावयास मिळाले.
दरम्यान, दोन्ही बाजूचा रस्ता ५ ते ८ जुलै रोजी बंद झाल्याने प्रवास करणारी काही वाहने व प्रवाशी अडकले आहेत. शासनाकडून दरडी हटवण्याचे काम तात्काळ करत एकेरी वाहने मार्गस्त होतील अशी दरड बाजूला करण्यात आली रस्त्यावरील माती पूर्ण पणे न काढल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी माती व चिखल दिसून येत आहे.
वारवंड ते उंबर्डे दरम्यान पडलेल्या दोन दरडी मधील अंतरात यामार्गावरुन प्रवास करणारी मोटारी व मालवाहतूक वाहने अडकलेली होती. रस्ता दोन्ही बाजूंना पडलेल्या दरडींमुळे ठप्प झाला होता. तसेच पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने अडकलेल्या वाहनांना दोन्ही बाजूने जाता येत नसल्याने अडकून पडली होती.
प्रवाशांना मात्र आसपास कोणतीही सोय नसल्याने दरड हाटवेपर्यंत तेथेच ताटकळत बसावे लागले होते उंबर्डे फाट्याजवळील असणाऱ्या हॉटेल येथे २७ गाड्या अडकल्या आहेत. येथील हॉटेल ही बंद असल्यामुळे जवळपास ७० ते ८० लोक रात्रीपासून या बिना अन्नपाण्याची रखडली होती.
तर दुसरीकडे, ताम्हिणी घाटातील डोंगरवाडी परिसरात रस्ता खचल्याची घटना घडल्याने पुणे -कोलाड मार्ग १५ दिवस वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. असे असले तरी वरंध घाट मार्गवर अनेक वाहने मार्गस्त होत आहेत.
महाड ते कावळा गड या जिल्हा हद्दीत चार ठिकाणी मातीचे ओसरे खाली आल्याचे निदर्शनास आहे तर जिल्हा हद्दीत दोन्ही बाजूने अडथळा म्हणून दगड ठेवण्यात आले आहेत मात्र या दोन्ही दगडाच्या मधून वाहने घालत प्रवासी प्रवास करत आहेत.