मुंबई; पुढारी वृत्तसेवा: उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे तीर्थयात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील चौघा यात्रेकरुंचा भीषण अपघातात मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातातील जखमींना ऋषिकेश येथील एम्स हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध करुन दिली. मृत्युमुखी पडलेल्या चौघा यात्रेकरुंचे पार्थिव राज्यात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी व्यक्तीश: लक्ष घालत ते मुंबईत आणले.
पालघर जिल्ह्यातील १८ यात्रेकरु ऋषिकेश येथे देवदर्शनासाठी गेले होते. या यात्रेकरुंच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातात मनोर येथील जितेश लोखंडे (वय ४३), वसई येथील धर्मराज खाटेकर (वय ४०), पुरुषोत्तम खिलखुटी (वय ३७ ), दहिसर येथील शिवाजी बुधकर (वय ५३ ) यांचा मृत्यू झाला. तर १४ यात्रेकरू जखमी झाले.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी घडलेल्या या दुर्घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांचे सहकारी सचिन जोशी यांना मिळताच त्यांनी तातडीने त्याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने उत्तराखंडमधील यंत्रणेशी संपर्क साधला आणि जखमींना ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली. एजखमींवर उपचाराची माहितीही घेतली.
मृतांचे पार्थिव त्याचदिवशी रात्री दिल्ली विमानतळावर आणण्यात आले. तेथून पहाटे हे पार्थिव मुंबईत विमानाने आणण्यात आले, त्यानंतर लगेचच ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मदतीबद्दल अपघातग्रस्तांचे नातेवाईक दयानंद सावंत यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
हेही वाचलंत का ?