

ठाणे : राजकारणात घड़ा आणि मोडी या सतत होत असतात, शिवसेनेमध्ये अशा प्रकारची फूट पडेल किंवा आम्ही शरद पवार यांना सोडू असे वाटले नव्हते, त्यामुळे पक्षाचे विलीनीकरण होईल की नाही, त्यानंतर चित्र काय असेल हे सांगायला मी ज्योतिषी नाही मात्र अशाप्रकारच्या तडजोडींमुळे नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे प्रामाणिक ध्येय असेल तर अशा तडजोडी करण्यात काहीच वाईट नाही असे रोखठोक मत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुढारी महासमिटमध्ये व्यक्त केले.
जेनझी अनेक मुद्द्यांवर आक्रमक होत आहे आणि ते स्वाभाविक सुद्धा आहे, त्यांना बळाने नाही तर त्यांच्याशी योग्य संवाद साधणे महत्वाचे आहे. जर संवाद साधला नाही तर प्रश्न सुटण्याच्या ऐवजी वाढतील असे विचार देखील त्यांनी यावेळी मांडले.
भुजबळांनी राजकारणाचा वेध घेताना अनेक मुद्यांना स्पर्श केला. आमच्यावेळी प्रश्न वेगळे होते, आताचे प्रश्न वेगळे आहेत, ज्या सुविधा परदेशात आहेत त्या इकडे का नाहीत असे आताच्या जेनझीना वाटते मात्र भारतामध्ये देखील अनेक सुविधा आहेत मग शिक्षण असो किंवा तंत्रज्ञान असो खूप मोठा बदल झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे या सुविधा देताना सरकार कुठेच कमी पडत नसल्याचे त्यांनी सांगितले. आता युवकांच्या चळवळी वाढल्या असल्या तरी, आम्ही देखील विरोधी पक्षात असताना सभागृह गाजवले आहे, आपण विरोधात असो किंवा सत्तेत असो प्रश्न योग्य पद्धतीने मांडले तर प्रश्न सुटत असल्याचे त्यांनी सांगितले.
पार्थ पवार उत्तम प्रकारे पक्ष सांभाळत आहेत...
राष्ट्रवादीमध्ये पार्थ पवार हे योग्य पद्धतीचे निर्णय घेत असून ते पक्ष योग्य पद्धतीने पक्ष सांभाळत असल्याचे भुजबळांनी सांगितले. ज्यावेळी शरद पवार यांनी काँग्रेस सोडली तेव्हा त्यांच्या सोबत केवळ छगन भुजबळ होते, आम्ही महाराष्ट्रभर विधानसभा निवडणुकीसाठी फिरलो, काँग्रेसचे दोन तुकडे होऊनही त्यावेळी लोकांनी आम्हाला कौल दिला, त्यावेळी अजित पवार तेवढे सक्रिय नव्हते, दुर्दैवाने त्यांचा अपघात झाला.