ठाणे : केतन म्हात्रेचे सलग सात षटकार व्यर्थ; चेन्नई सिंगम्सचा माझी मुंबईकडून पराभव

ठाणे : केतन म्हात्रेचे सलग सात षटकार व्यर्थ; चेन्नई सिंगम्सचा माझी मुंबईकडून पराभव

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : चेन्नई सिंगम्सला इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (आयएसएपीएल) टी-10 मध्ये दादोजी कोंडदेव स्टेडियमवर रविवारी माझी मुंबईविरुद्ध 21 धावांनी पराभूत व्हावे लागल्याने धडाकेबाज सलामीवीर केतन म्हात्रेच्या अवघ्या 21 चेंडूंत 60 धावांची खेळी व्यर्थ ठरली. त्याने एकूण नऊ षटकारांची आतषबाजी केली. त्यातील सात सलग आहेत. सलग दोन विजयांनंतरचा चेन्नईचा आयएसपीएलमधील हा पहिला पराभव आहे.

म्हात्रेची चौफेर फटकेबाजी

150 धावांचे मोठे लक्ष्य असताना खराब सुरुवातीमुळे चेन्नईची अवस्था 2 बाद 8 धावा अशी झाली. मात्र, केतनने अफलातून फलंदाजी करताना सामन्याचा नूरच पालटला. दुसर्‍या ओव्हरपासून ते चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूपर्यंत त्याने डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप मिडविकेट क्षेत्रात सिक्सरवर सिक्सर्स ठोकले.

माझी मुंबई संघाचा विजय पावले याला केतनने प्रमुख्य लक्ष्य केले. त्याने टाकलेल्या तिसर्‍या षटकात म्हात्रेने पाच वेळा चेंडू प्रेक्षकांमध्ये फेकून दिला आणि अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. परंतु, सहाव्या षटकात सलामीवीर केतन बाद झाला आणि सामना फिरला. त्यावेळी चेन्नईला जिंकण्यासाठी आणखी 72 धावांची गरज होती.

50-50 चॅलेंज

आयएसपीएलचा एक अनोखे पैलू म्हणजे 50-50 चॅलेंज. फलंदाजी करणारा संघ स्वतःला किमान 16 धावांचे लक्ष्य सेट करतो आणि प्रतिस्पर्धी संघातून कोणी गोलंदाजी करायची हे निवडतो. फलंदाजी करणार्‍या संघाने लक्ष्य गाठल्यास किंवा ओलांडल्यास 50 टक्के अधिक धावा जोडल्या जातात. जर एखाद्या संघाने 20 धावा केल्या तर त्यांना त्या षटकासाठी 30 धावा मिळतील आणि जर त्यांनी 10 धावा केल्या तर त्यांना फक्त पाच धावा मिळतील.

चेन्नईने सातव्या षटकात देविद गोगोईच्या गोलंदाजीवर 50-50 चॅलेंजमध्ये 17 धावा केल्या आणि एकूण धावसंख्या 25 धावांनी वाढवली. पण त्यांनी संजय कनोजिया आणि विश्वनाथ जाधव (12 चेंडूंत 23 धावा) यांच्या विकेट्सही गमावल्या. पावले आणि अभिषेक कुमार डल्होर यांच्या दोन अचूक षटकांनंतरही गोगोईच्या शेवटच्या षटकात चेन्नईसमोर खूप धावा करण्याचे आव्हान होते. पण त्यांना दहा षटकांत 9 बाद 128 धावा करता आल्या.

मुंबईला प्रारंभीच झटके

डावखुरा वेगवान गोलंदाज आर. थविथ कुमारची दोन प्रभावी षटके तसेच फरमान खान आणि जाधव यांच्या अचूक गोलंदाजीमुळे मुंबईला प्रारंभी झटके बसले. त्यांची अवस्था 3 बाद 26 अशी झाली. मात्र, डल्होर आणि पावले यांनी केलेल्या अनुक्रमे नाबाद 43 आणि 41 धावा तसेच कृष्णा पवार आणि अश्रफ खानमुळे मुंबईने 5 बाद 149 धावांची मजल मारली.

संक्षिप्त धावफलक : माझी मुंबई -10 षटकांत 5 बाद 145 (अभिषेक डल्होर 43*,
विजय पावले 41; विश्वनाथ जाधव 2-21, फरमान खान 2-33) वि. चेन्नई
सिंगम्स – 10 षटकांत 9 बाद 128 (केतन म्हात्रे 60, विश्वनाथ जाधव 23;
अभिषेक दलहोर 3-20, देविद गोगोई 3-29) निकाल : माझी मुंबई 21 धावांनी विजयी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news