

अंबाडी : भिवंडी ग्रामीण भागातील झिडके ग्रामपंचायतीवर विकास वाडी व किरकिंडा पाडा येथे श्रमजीवी संघटनेच्या वतीने विविध नागरी सुविधांच्या मागण्यांसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात आले. पाड्यातील मूलभूत समस्या तातडीने सोडवण्याची मागणी करत ग्रामस्थांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आणि दोन दिवसात कामे करा अन्यथा ग्रामपंचायतीला कुलूप ठोकू असा इशारा त्यांनी दिला आहे.
या आंदोलनाची गंभीर दखल घेत ग्रामसेविका यांनी येत्या दोन दिवसांत दोन्ही पाड्यांत पाणी, वीज आणि शौचालयाची व्यवस्था त्वरित करण्याचे सांगितले आहे. याशिवाय, जातीचे दाखले, रेशन कार्ड व आधार कार्ड काढण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष कॅम्प आयोजित करण्यात येईल, तसेच घरपट्टी व घरकुल नोंदणीची कामे तातडीने पूर्ण केली जातील, असे त्यांनी आंदोलनकर्त्यांना स्पष्ट केले.
या आंदोलनाला जिल्हा उपाध्यक्ष व भिवंडी ग्रामीण अध्यक्ष सागर देसक, विश्वनाथ पासारी, जयेश पाटील, कल्पेश पाटील, रोहिणीताई पवार, स्वाती शिंदे, संगीता भड, मायाताई जाधव, प्रदीप मांजरेकर, मुकेश तोरणेकर, सुभाष साळुंखे यांच्यासह गाव कमिटीचे सभासद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोर्चाचा इशारा
ग्रामपंचायतीने दिलेल्या मुदतीमध्ये ही सर्व विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करावीत अन्यथा ग्रामपंचायतीवर यापेक्षाही भव्य मोर्चा काढण्यात येईल. तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा शिष्टमंडळाने स्पष्ट शब्दांत दिला आहे.