

भिवंडी : सध्या आंब्याचा मोहर बहरला असून झाडावर कैऱ्या लागल्या आहेत. या कैऱ्या तोडण्यासाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांना आंब्याच्या झाडे मालकाने बेदम मारहाण केल्याची घटना भिवंडी शहरातील चाविंद्रा येथील नत्थु नगर परिसरात घडली आहे. या मारहाणीत एका मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला असून इतर तीन मुले गंभीर जखमी झाली आहेत.
नत्थु नगर या परिसरात विलास पाटील यांच्या मालकीच्या जागेत आंब्याचे झाड आहे. या झाडाला लागलेल्या कैऱ्या चोरून तोडण्यासाठी अवचितपाडा येथील अल्पवयीन मुले रविवारी गेले होते. त्यांना आंबे तोडताना मालक विलास पाटील यांनी बघितल्यावर त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने पाठलाग करून मुलांना पकडून बेदम मारहाण केली.
मुलांना इतक्या निर्दयीपणे मारण्यात आले की त्यांच्या संपूर्ण शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. या मारहाणीत मुले बेशुद्ध झाल्यावर एका स्थानिक व्यक्तीने तत्काळ मदत करत त्यांना गाडीतून इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल येथे दाखल केले. डॉक्टरांनी मुलांवर प्राथमिक उपचार केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून विलास पाटील विरोधात अल्पवयीन मुलांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.