

भिवंडी: मागील दोन दिवसांत शहरातील वेगवेगळ्या भागांतून चार अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी वेगवगेळ्या पोलीस ठाण्यात अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या घटनेत ६ जुलै रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास शहरातील वेताळ पाडा हद्दीत राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेले. याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत कामतघर येथील परिसरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ५ जुलै रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घरातून कामाला जाते असे सांगून घरातून गेली ती परतली नसून तिचा परिसरात, मैत्रीणीकडे, तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती सापडलेली नाही.
त्यामुळे कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केल्याच्या संशयावरून वडिलांच्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसरी घटना ही नारपोली पोलीस ठाण्यात घडली. काल्हेर येथील १६ वर्षीय मुलगी ९ जुलै रोजी दुपारी घरातून निघून गेली, ती घरी परतली नाही. नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर, कोंबडपाडा येथील अल्पवयीन मुलगी ८ जुलै रोजी घरातून गेली, ती घरी परतली नाही. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.