

ठाणे : प्रवीण सोनावणे
राज्यात एकीकडे मोठ्या प्रमाणात शाळा बंद पडत असताना दुसरीकडे शिक्षकी पेशाकडे जाण्याचा तरुणांचा आणि विशेष करून महिला वर्गाचा कल कायम असल्याचे समोर आले आहे. 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी राज्यात बी.एड. प्रवेश प्रक्रियेसाठी 1 लाखांपेक्षा अधिक जणांनी नोंदणी केली आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते राज्यात अनेक शाळा बंद पडत असल्या, तरी खासगी शाळांची विशेष करून इंग्रजी शाळांची संख्या वाढली आहे.
शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतल्या जाणाऱ्या बी.एड. प्रवेश परीक्षेसाठी यंदा 1,09,485 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यात 7,040 ने घट झाली असली, तरी हे प्रमाण जास्त नसल्याने शिक्षक होण्याकडे तरुणांचा कल कायम असल्याचे दिसते. त्यामुळे या शैक्षणिक वर्षेसाठी बीएडसह एमएड आणि एमपीएड अशा तिन्ही अभ्यासक्रमांसाठी एकूण 1 लाख 16 हजार 122 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
राज्य सरकारने 2026-27 च्या अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी 89,240 कोटी रुपयांची तरतूद केली असली, तरी राज्यातील शाळांची परिस्थिती बिकट आहे. सरकारी शाळांमध्ये केवळ 23.68 टक्के विद्यार्थी आहेत. तर अनुदानित शाळांमध्ये हेच प्रमाण 45.47 टक्के आहे. विशेष म्हणजे राज्यात 8,192 शाळा अशा आहेत जिथे फक्त एकच शिक्षक आहे. राज्यात शिक्षण क्षेत्राची अशी भयावह परिस्थिती असतानाही शिक्षक होण्याकडे तरुणांचा कल मात्र कमी झालेला नाही.
मान सन्मान आणि महिला वर्गासाठी सुरक्षित नोकरी म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन
डी.एड. करून बी.एड. करण्यासाठी ही प्रवेश परीक्षा दिली जाते, त्यामुळे आकडा वाढलेला दिसतो.
अनेक शाळा बंद पडत असल्या तरी स्वयं अर्थसहायातून सुरू होणाऱ्या शाळांचे प्रमाण वाढले.
राज्यात इंग्रजी शाळांची संख्या वाढल्यामुळे नोकरीच्या संधी वाढल्या आहेत.
शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन कामांचा समावेश केल्यामुळे तरुण वर्गाचा शिक्षक होण्याकडे कल वाढला आहे.