

बदलापूर: ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. बारवी धरणात सध्या एकूण ५५ टक्के इतका पाणीसाठा असून धरणात १८६ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
बारवी धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता ३३९ दशलक्ष घनमीटर इतकी असून धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी कमी साठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी २० जुलैपर्यंत बारवी धरणात ७० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा उपलब्ध होता.
यंदा मात्र जून महिना कोरडा गेल्याने तसेच जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात पाऊस पडल्यानंतर गेला आठवडाभर पाऊस पडला नाही. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली नसली, तरी सध्या धरणात ५५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील सहा महानगरपालिका, दोन नगरपालिका आणि औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यात येतो. यात ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर आणि मीरा-भाईंदर या महानगरपालिका तसेच अंबरनाथ आणि बदलापूर या नगरपालिका क्षेत्रातील काही भाग, तसेच ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात येतो.
बारवीची उंची वाढवून साठवणूक क्षमता वाढविल्यानंतर हे धरण ऑगस्टच्या शेवटपर्यंत काठोकाठ भरते. यंदा मात्र पावसाने ओढ दिल्यामुळे धरणात सध्या ५५ टक्के पाणीसाठा असल्याने धरण पूर्ण कधी भरणार, याबाबत साशंकता आहे.
अल निनोमुळे लहरी पाऊस
पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात निश्चितच वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांना यंदा पिण्याच्या पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागणार नाही. पाऊस सुरळीत झाला, तर पुढील वर्षीही अशी परिस्थिती उद्भवणार नाही. अल निनोच्या परिणामामुळे पावसाच्या लहरीपणामुळे बारवीचा पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे.