

डोंबिवली: गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे तानसा, मोडक सागर धरणे शंभर टक्के भरली असताना आता कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेले बारवी धरण ६८.१० टक्के भरले आहे.
गेले दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे बारवी धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ होत चालल्याचे दिसून येत आहे. वरुणराजाच्या मेहेरबानीमुळे कल्याण-डोंबिवलीकरांसह जिल्हावासीयांची चिंता हळूहळू मिटणार आहे. धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरण वेगाने भरू लागले आहे.
शुक्रवारी सकाळी ७ वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार बारवी धरणाची पाणीपातळी ६८.५० मीटर झाली आहे. धरणाची कमाल ओव्हरफ्लो पातळी ७२.६० मीटर आहे. सध्या धरणात २३०.७ द.ल.घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
त्यामुळे धरण ६८.१० टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासांत धरण क्षेत्रात सरासरी ८२.६० मिमी पावसाची नोंद झाली. या मोसमात आतापर्यंत एकूण १६७८.६० मिमी सरासरी पाऊस झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत चांगला पाऊस झाल्याची नोंद आहे.