

नेवाळी: कल्याण-शीळ रोडवरील मेट्रो - १२ च्या कामामुळे शुक्रवारी पहाटे मानपाडा जंक्शन परिसरात पुन्हा एकदा भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
सकाळी ६ वाजल्यापासून सुरू झालेल्या वाहतूक कोंडीमुळे जवळपास दोन तास वाहनचालक आणि प्रवाशांना रस्त्यावरच अडकून राहावे लागले. त्यामुळे कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी, शालेय बस, रुग्णवाहिका, रिक्षा तसेच मालवाहू वाहनांचा मोठा खोळंबा झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला आहे.
कल्याण-शीळ रस्ता हा कल्याण, डोंबिवली, तळोजा, नवी मुंबई आणि ठाणे यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पामुळे अनेक ठिकाणी रस्त्याची रुंदी कमी झाली असून वाहतुकीसाठी मर्यादित जागा उपलब्ध आहे. त्यामुळे सकाळच्या आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहतुकीचा ताण वाढत आहे.
शुक्रवारी सकाळी मानपाडा जंक्शन येथे मेट्रोच्या कामासाठी उभारण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे वाहतूक संथ झाली आणि काही वेळातच दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, वाहतूक कोंडी अधिक वाढण्यास उलट दिशेने वाहन चालवणारे चालकही कारणीभूत ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. कोंडीतून लवकर बाहेर पडण्याच्या प्रयत्नात काही वाहनचालकांनी विरुद्ध दिशेने वाहने चालविल्याने समोरून येणाऱ्या वाहनांचा मार्ग अडवला गेला होता. परिणामी संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे सर्वांनाच वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले.
दुहेरी फटका
मानपाडा जंक्शन परिसरात एकीकडे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असतानाच दुसरीकडे भूमिगत केबल टाकण्यासाठी रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे मेट्रो कामामुळे अरुंद झालेलारस्ता अधिकच संकुचित झाला आहे. वाहतुकीसाठी जागा कमी उपलब्ध झाल्याने वाहनांच्या रांगा लागत असून कोंडीत भर पडत आहे. पावसात काम हाती घेतल्याने नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.