ठाणे : बंजारा समाजाने त्यांना अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात सामाविष्ट करण्याची मागणी सुरू केल्याने आता आदिवासी समाजाने त्यास विरोध सुरू केला आहे. आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने ठाणे जिल्ह्यातील शहापूर ते मुंबईतील मंत्रालय असा पायी मोर्चा काढला.
हैदराबाद गॅजेटिअरप्रमाणे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सोमवारी बंजारा सामाजाने विविध ठिकाणी आंदोलन केले.आदिवासी समाजाकडून आरक्षणाच्या मागणीस विरोध होत आहे.
यावर आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने शहापूर ते मंत्रालय असा पायी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.याचे नेतृत्त्व अखिल भारतीयविकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव, युवा प्रदेश अध्यक्ष गणेश गवळी, संदीप गवारी, गोरख रहेरे, प्रफुल फुटे यांनी केले.
मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडी
रविवारी हा मोर्चा शहापूर येथून निघाल्यावर रविवारी रात्री आंदोलकांनी कल्याण येथे विश्रांती घेतली. त्यानंतर सोमवारी पुन्हा मुंबई -नाशिक महामार्गाने हा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला. ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गावर मोर्चा पोहचताच, मुंबई -नाशिक महामार्गावर माजिवडा, कॅडबरी जंक्शन भागात वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे मुंबईच्या दिशेने वाहतूक करणार्या चालक आणि प्रवाशांना कोंडीचा सामना करावा लागला.