बदलापूर; पुढारी वृत्तसेवा : बारवी धरणाची गुरुवारी सकाळी ७ वाजता पाणीपातळी ७०.६४ मी झाली असून पाणीपातळीत सतत वाढ होत आहे. बारवी धरणावरती ११ स्वयंचलित वक्रद्वारे बसविण्यात आलेली आहेत. त्याची उच्चतम विसर्ग पातळी ७२.६० मीटर आहे. पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने सतर्कतेच्या सूचना एमआयडीसी प्रशासनाने दिल्या आहेत.
बारवी धरणाची पाणी पातळी ७२.६० मी. वर गेल्यानंतर स्वयंचलित वक्रद्वारे आपोआप उघडून पाण्याचा विसर्ग सुरु होतो. सद्यस्थितीतील चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे उल्हास नदीत पूर परिस्थिती उद्भवलेली असल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करणे शक्य होत नाही. धरणाच्या पाणी पातळीत मात्र झपाटयाने वाढ होत आहे. स्वयंचलित वक्र दरवाजातून नदीत पाण्याचा विसर्ग कधीही सुरु होऊ शकतो. त्यामुळे बारवी नदीच्या तीरावरील अस्नोली, चांदप, चांदपपाडा, पिंपळोली, सागांव, पाटीलपाडा, पादोरपाडा, कारंद, मोन्याचापाडा, चोण, रहाटोली व नदी काठावरील इतर गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा :