AI Education: एआयने बुद्धीला वेग दिला; आता संस्कारांना दिशा देण्याची वेळ!

‘स्मार्ट’ विद्यार्थ्यांपेक्षा ‘मूल्य-सक्षम’ नागरिक घडविणे काळाची गरज; शिक्षणव्यवस्थेसमोर नवे आव्हान
AI
AIPudhari
Published on
Updated on

अर्जुन चेमटे

वागळे: कृत्रिम बुद्धिमत्तेने अर्थात ‘एआय’ने शिक्षणासह विविध क्षेत्रांत मोठी क्रांती घडवून आणली आहे. काही क्षणांत माहिती मिळविणे, अवघड विषय समजून घेणे, लेखन, भाषांतर आणि संशोधन यांसारखी कामे सहज शक्य झाली आहेत. विद्यार्थ्यांसाठी एआय हे ज्ञानाचे प्रभावी साधन ठरत असले, तरी त्यातून हुशार पिढी घडत असताना ती प्रामाणिक, संवेदनशील आणि विवेकी घडते आहे का? हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.

आज विद्यार्थ्यांच्या बोटांवर जगातील माहिती उपलब्ध आहे. मात्र माहिती म्हणजे ज्ञान आणि ज्ञान म्हणजे शहाणपण नव्हे. कोणती माहिती खरी, कोणती दिशाभूल करणारी, तंत्रज्ञानाचा वापर कुठे करायचा आणि कुठे थांबायचे, यासाठी विवेकबुद्धी आवश्यक आहे.

AI
Bhayandar 495 Crore Case: ४९५ कोटींच्या निधीला परदेशी वाट; भाईंदरमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार

एआय उत्तर देऊ शकतो; पण त्या उत्तराचा योग्य-अयोग्य विचार विद्यार्थ्याने स्वतः करणे गरजेचे आहे. अवघड संकल्पना समजून घेणे, प्रश्नसंच तयार करणे, लेखन सुधारणे आणि भाषांतरासाठी एआयचा उपयोग होऊ शकतो.

मात्र प्रत्येक कामासाठी त्यावर अवलंबून राहिल्यास स्वतंत्र विचारशक्ती आणि सर्जनशीलतेवर परिणाम होऊ शकतो. एआयकडून तयार केलेला गृहपाठ किंवा प्रकल्प स्वतःचा म्हणून सादर करणे ही प्रामाणिकतेच्या मूल्याला बाधा आणणारी बाब आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांना एआयपासून दूर ठेवण्याऐवजी त्याचा नैतिक, जबाबदार आणि योग्य वापर कसा करायचा, माहितीची सत्यता कशी तपासायची आणि स्वतःचा विचार कसा विकसित करायचा, हे शिकवणे आवश्यक आहे.

तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले असले, तरी घरातील प्रत्यक्ष संवाद कमी होत आहे. एकाच घरात राहून प्रत्येकाचे लक्ष मोबाईलच्या स्क्रीनवर असते.

AI
POP Ganesh Idol Rule: प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर लाल चिन्ह बंधनकारक

आई-वडिलांशी प्रेमाने बोलणे, आजी-आजोबांचे अनुभव ऐकणे आणि वडीलधाऱ्यांचा आदर करणे ही मूल्येही मुलांनी शिकली पाहिजेत.संस्कार गुगलवर शोधून मिळत नाहीत आणि एआय ते तयार करू शकत नाही.

मूल्यशिक्षणाचा तास नव्हे, संस्कारांचा जीवनभराचा धडा हवा

मूल्यशिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकातील गोष्टी किंवा आठवड्यातील एक तास नव्हे. प्रामाणिकपणा, शिस्त, सहकार्य, करुणा, पर्यावरणप्रेम, श्रमप्रतिष्ठा आणि इतरांविषयी आदर ही मूल्ये विद्यार्थ्यांच्या वर्तनात दिसली पाहिजेत.

शाळेतील प्रत्येक विषय आणि उपक्रमातून मूल्यशिक्षण रुजविणे आवश्यक आहे.वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, समाजसेवा, वाचन, क्रीडा आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांना मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव देता येतो. उपदेशापेक्षा कृतीतून मिळालेला संस्कार अधिक प्रभावी ठरतो.

शिक्षकांची भूमिका अधिक महत्त्वाची

एआय माहिती देऊ शकतो; मात्र विद्यार्थ्याला प्रेरणा देणे, त्याच्या भावना समजून घेणे, योग्य-अयोग्याची जाणीव करून देणे आणि माणुसकी रुजविणे हे शिक्षकाचेच कार्य आहे. त्यामुळे एआयच्या युगात शिक्षकांची भूमिका कमी न होता अधिक व्यापक होणार आहे. मूल्यशिक्षणाची सुरुवात घरातून होते.

मुलांना डिजिटल साधनांपासून दूर ठेवण्यापेक्षा त्यांचा शिस्तबद्ध आणि जबाबदारीने वापर शिकवणे गरजेचे आहे. त्यासाठी पालकांनीही स्वतः डिजिटल शिस्त पाळणे आवश्यक आहे.आज गरज केवळ ‘एआय-सक्षम’ विद्यार्थ्यांची नाही, तर ‘मूल्य-सक्षम’ नागरिकांची आहे. तंत्रज्ञान भविष्य घडवू शकते; मात्र विवेक, संस्कार आणि माणुसकीच त्या भविष्याला योग्य दिशा देऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news