

योगेश गोडे
सापाड: कल्याण-डोंबिवली महानगर- पालिकेच्या परिवहन विभागात सेवा देणारे कंत्राटी कामगार गेल्या तीन महिन्यांपासून पगारापासून वंचित असल्यामुळे सणासुदीच्या दिवसात शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
त्यामुळे चार दिवसात येणारा गणेश उत्सव कसा साजरा करायचा ही चिंता कामगारांना सतावत असून गणरायाच्या आगमनापूर्वी पगार मिळाले नाही तर आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार नेते उल्हास भोईर यांनी दिला आहे.
आता गणरायाच्या आगमनापूर्वी परिवहन सेवेच्या कामगारांना थकीत पगार मिळतोय का पगारासाठी कामगारांना संघर्ष करावा लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. कल्याण डोंबिवली महानगर- पालिका परिवहन खात्यात काम करणाऱ्या ८६ कंत्राटी बस वाहक यांचा तीन महिन्यांचा पगार ठेकेदाराकडून देण्यात आला नसल्यामुळे या कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असून संसाराचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
सणासुदीच्या दिवसात पगाराअभावी या कामगारांच्या परिवारावर आर्थिक संकट कोसळले असून गणरायाच्या आगमनाची तयारी कशी करायची या चिंतेत व्याकुळ कामगारांच्या कुटुंबीयांनी आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
परिवहन खात्यातील कंत्राटी कामगारांच्या थकीत पगार ठेकेदाराकडून मिळावा यासाठी कामगारांनी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निवासस्थानी गेटवर रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधून साकडं घातलं. त्यानंतर आयुक्तांनी देखील ठेकेदाराला कामगारांचे थकीत पगार तत्काळ देण्याचे आदेश दिले होते.
मात्र आदेशाला केराची टोपली दाखवत कंत्राटी कामगारांच्या थकीत पगार देण्यास ठेकेदार अयशस्वी ठरला म्हणून कामगारांनी लोकांयुक्तांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. थकीत पगार तत्काळ मिळाले नाहीत तर उत्तर देणार असल्याचा इशारा मनसेचे कामगार नेते जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला.
थकीत पगार तत्काळ मिळवण्यासाठी महापलिका आयुक्तांकडे साकडे घातले होते. त्यानंतर आयुक्त अभिनव गोयल यांनी देखील ठेकेदाराला कामगारांचे थकीत पगार देण्याचे आदेश दिले होते. मात्र आदेशाला केराची टोपली दाखवत कामगारांचे थकीत पगार दिले नाहीत. त्यानंतर आम्ही कामगारांना घेऊन कामगार आयुक्तांकडे ठेकेदाराची तक्रार केली मात्र तेथे देखील ठेकेदाराने कामगार आयुक्तांकडे सुनावणीसाठी हजर न राहिल्यामुळे आता आम्ही मनसे स्टाईलने ठेकेदाराला उत्तर देऊ.
- उल्हास भोईर, जिल्हाध्यक्ष मनसे