डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : गेल्या महिन्यात अमुदान कंपनीमध्ये झालेल्या रिॲक्टरच्या शक्तिशाली स्फोटानंतर डोंबिवली एमआयडीसीतील घातक केमिकलच्या कंपन्या स्थलांतरित करण्याचे मागणी जोर धरू लागली आहे. कंपन्यांमध्ये आग आणि स्फोटांच्या घटना वारवांर घडत आहे. या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे एमआयडीसीतील कंपन्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे. आतापर्यंत केलेल्या सर्वेक्षणात नियमांचे पालन न करणाऱ्या ३३ कंपन्यांना क्लोजर नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. तर ८ कंपन्यांना वॉलियंटरी क्लोजर नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.
गेल्या महिन्यातील २३ तारखेला अमुदान कंपनीमध्ये झालेल्या रिॲक्टरच्या शक्तिशाली स्फोटानंतर बुधवारी माल्दे कॅपॅसिटर्स कंपनीसह इंडो अमाईन्स या केमिकल कंपनीत स्फोट होऊन भीषण आग लागली. अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याने या परिसरातील घातक केमिकलच्या कंपन्या स्थलांतरित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या कंपन्यांमधील कामगारांच्या सुरक्षिततेसह प्रदूषणाबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांची धोकादायक आणि अतिधोकादायक अशी वर्गवारी करत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
डोंबिवली एमआयडीसीच्या फेज १ आणि २ परिसरात जवळपास ७५० विविध उत्पादने घेणाऱ्या कंपन्या आहेत. यातील १५० रासायनिक, तर ११० कापड उद्योग आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कंपन्यांचे सर्वेक्षण सुरू करून आत्तापर्यंत ३३ कंपन्यांना क्लोजर नोटिसा पाठविल्या आहेत. या नोटिसांनंतर संबंधित कंपन्यांचा पाणी व वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. तर ८ कंपन्यांना वॉलियंटरी क्लोजर नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. या कंपन्यांना स्वतःहून कंपनी बंद करावी नाहीत कार्यवाही करावी लागेल असे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा