

भिवंडी: शहरातील खंडूपाडा परिसरात चिकन शोरमा, पिझ्झा आणि फालुदा खाल्ल्या नंतर एका कुटुंबातील ६ व इतर असे एकूण १४ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना गुरवारी घडली आहे. बाधित रुग्णांना मळमळ उलटी याचा त्रास जाणवू लागल्याने सर्व रुग्णांना उपचारासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यांच्यावर उपचार सुरू केल्यानंतर रात्री व आज सकाळी अजून २३ रुग्ण हाच त्रास होत असल्याने रुग्णालयात सध्या ८० रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित नागरिकांनी शहरातील खंडू पाडा परिसरातील फेमस शोरमा नावाच्या दुकानातून चिकन शोरमा, पिझ्झा खरेदी करून काल रात्री घरी नेऊन खाल्ले होते.
त्यानंतर आज सकाळपासूनच काही जणांना अस्वस्थ वाटू लागले. दुपारपर्यंत त्रास वाढल्या-नंतर सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. विषबाधा झालेल्या व्यक्तींना उलट्या, पोटदुखी, मळमळ, जुलाब आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणे जाणवू लागली होती.
रुग्णांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी प्राथमिक अंदाजा नुसार अन्नातून विषबाधा झाल्याचे सांगितले आहे. त्यानुसार या सर्व रुग्णांवर स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत असून अजून रुग्ण दाखल होत आहेत अशी माहिती सुग्णालयाच्या अधीक्षका डॉ. माधवी पंदारे यांनी दिली असून नागरिकांनी सध्याच्या उष्माघाताच्या परिस्थि- तीमध्ये घरातील सकस अन्न पदार्थ खावेत असे आवाहन केले आहे.
या घटने नंतर रात्री उशिरा अन्न निरीक्षक पथक दाखल होत त्यांनी हॉटेल मधील अन्न पदार्थांचे नमुने तपासणी साठी घेतले असून शांतीनगर पोलिस ठाण्यात हॉटेल चालक दिलशाद अन्सारी या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे.