डोंबिवली स्फोट प्रकरण : मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता | पुढारी

डोंबिवली स्फोट प्रकरण : मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : डोंबिवलीतील अमुदान कंपनीत झालेल्या रिॲक्टरच्या शक्तिशाली स्फोटानंतर 3 कंपन्यांतील बेपत्ता झालेल्या 12 जणांची तक्रार त्यांच्या निकटवर्तीयांसह नातेवाईकांनी पोलिसांकडे केली आहे. गेल्या 48 तासांत आतापर्यंत 3 मृतदेहांची ओळख पटली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटात 13 मृतदेह सापडले असून 2 जणांचे फक्त अवशेष सापडले आहेत. त्यातच शनिवारी दिवसभरात 3 मृतदेह हाती लागल्याने मृतांची संख्या 16 झली आहे. अद्याप मलबा उचलण्याचे काम संपलेले नसल्याने या मलब्याखाली अजूनही मृतदेह गाडले असावेत, असा तपास यंत्रणेचा अंदाज आहे. त्यामुळे या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या मृतदेहांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गुरूवारी (दि.23) दुपारी झालेल्या दुर्घटनेत 68 जखमी झाले. या जखमींना खासगी आणि केडीएमसीच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 42 जणांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर 26 जणांवर उपचार सुरू आहेत. पैकी 12 रूग्णांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार आहेत.

या दुर्घटनेत तीन कंपन्यातील 12 जण बेपत्ता असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या. शोध मोहिमेत 10 जणांचे मृतदेह हाती लागले असून 2 जणांचे अवशेष सापडले आहेत. अमुदान कंपनीमधील 10, दत्तवर्ण कॉसमॉस कंपनीमधील 1 आणि सप्तवर्ण कंपनी मधील 1 असे 12 कामगार बेपत्ता होते. याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

शोध मोहिमेत मृतदेह आणि मानवी अवशेष सापडले आहेत. अमुदान कंपनीमधील 10, कॉसमॉस कंपनीमधील 1 आणि सप्तवर्ण कंपनीतील 1 असे 12 जण बेपत्ता होते. यातली 3 जणांची ओळख पटली आहे. तर 7 जणांचे मृतदेह आणि अवशेषांची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांचे डीएनए सॅम्पल घेण्यात आले आहेत. ओळख पटल्यानंतर हे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले जाणार आहेत.

एनडीआरएफ आणि अग्निशामक दलाची टीम गेल्या 48तासांपासून घटनास्थळी बचावकार्य करत आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना शोधून बाहेर काढण्याचे काम अद्यापही सुरू आहे. शनिवारी सकाळी 2 मानवी अवशेष सापडले आहेत. दुसरीकडे, या दुर्घटनेत आपल्या नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे का? याची खात्री पटत नसल्याने कंपन्यांतून काम करणाऱ्या कामगारांचे कुटुंब हताश झाले आहे. अजूनही आपले वडील, भाऊ, मुलगा, मुलगी सुखरूप परत येईल अशा हताश नजरेने नातेवाईक हॉस्पिटलबाहेर फेऱ्या मारत आहे.

खासगी आणि शासकीय रुग्णालयांसह पोस्टमार्टम रूममध्ये आपल्या नातेवाईकांची शोधाशोध ते करत आहेत. आपली बेपत्ता झालेली व्यक्ती सापडत नसल्याने या नातेवाईकांनी कंपन्यांच्या परिसरात जमा होऊन शोध घेण्यास सुरुवात केली. आपल्या बेपत्ता व्यक्तीचा शोध घेणाऱ्यांना प्रशासन योग्य वागणूक देत नसल्याचा आरोप करत नातेवाईकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Back to top button