ठाणे : बदलापुरातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ होणार कायमस्‍वरूपी बंद; प्रवाशांना बसणार फटका | पुढारी

ठाणे : बदलापुरातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ होणार कायमस्‍वरूपी बंद; प्रवाशांना बसणार फटका

बदलापूर ; पंकज साताळकर बदलापूरकरांना “आवळा देऊन कोवळा काढण्याचा” प्रकार मध्य रेल्वेने केला आहे. होम प्लॅटफॉर्मच्या नावाखाली बदलापूरकरांची शुद्ध फसवणूक करण्याचा प्रकार आता समोर आला आहे. कारण सध्याचा प्लॅटफॉर्म क्रमांक एक हा कायमस्वरूपी बंद करण्याचा तुघलकी निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे बदलापूर पूर्व भागात राहणाऱ्या प्रवाशांना तर याचा सर्वाधिक फटका बसणार आहेच, मात्र अत्यंत तूटपुंज्या जागेत बांधलेल्या होम प्लॅटफॉर्मवर जे बदलापूरचे प्रवासी उतरणार आहेत त्यांचाही मोठा गोंधळ उडणार आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्लॅटफॉर्मवर एक्सलेटर आणि लिफ्ट बसवण्यासाठी फलाट क्रमांक एकवर बॅरिकेटिंग लावून तो कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. येत्या ७ दिवसांत त्याची अंमलबजावणी होणार असून, त्या दृष्टीने मध्य रेल्वे प्रशासनाने कामही सुरू केले आहे. या मध्य रेल्वेच्या तुघलकी निर्णयाविरोधात बदलापुरातील रेल्वे प्रवासी आणि रेल्वे संघटनांकडून संताप व्यक्त होत आहे. या निर्णयाला बदलापूरतील रेल्वे प्रवासी आणि संघटनांनी कडाडून विरोध सुरू केला आहे.

सध्या बदलापुरातील प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरुन मुंबई सीएसटीच्या दिशेने गाड्या सुटतात. होम प्लॅटफॉर्मचे काम लवकरच पूर्ण होणार असल्याने सध्या या ठिकाणी प्रवाशांना दिलासा मिळत असतानाच गाजर दाखवून बदलापूरकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार मध्य रेल्वे प्रशासनाने केल्याची भावना बदलापुरातील संतप्त रेल्वे प्रवासी व्यक्त करत आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोनवर लिफ्ट बसवणे एक्सलेटर लावणे अशी कामे करावयाची असल्याचे सांगत प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर बॅरिकेटिंग बसवून ते पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे जे प्रवासी पूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि होम प्लॅटफॉर्मवरून मुंबई दिशेला जात होते त्या सर्व प्रवाशांना आता होम प्लॅटफॉर्मवर जाऊन मुंबई सीएसएमटीच्या दिशेला गाडी पकडावी लागणार आहे.

अर्धवट अवस्थेत असलेली काम आणि होम प्लॅटफॉर्मची अपुरी जागा यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी या प्लॅटफॉर्मवर होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक वेळा मुंबई सीएसएमटीला जाणारी गाडी ही प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर थांबविले जाते. त्यामुळे जर असा प्रकार घडल्यास मोठा गडबड गोंधळ होऊन जीवित हानी होण्याची ही शक्यता नाकारता येत नाही. तसेच ज्या प्रवाशांना वांगणी ते कर्जत पुणे किंवा खोपोलीपर्यंत प्रवास करायचा आहे ते अनेक प्रवासी बदलापूर करणे येऊन बदलापूर स्थानकात उतरत होते. त्यांनाही आता कर्जत गाडी पकडण्यासाठी संपूर्ण प्लॅटफॉर्मवर ब्रिज चढून प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर यावे लागणार आहे.

रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबईमध्ये बसून निर्णय घेताना स्थानिक परिस्थितीचा कोणताही विचार न करता थेट बॅरिकेटिंगचे काम सुरू करून बदलापुरातील रेल्वे प्रवाशांना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना जूमानत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. बदलापुरात आधीच रेल्वे गाड्यांची संख्या कमी आहे. त्यात सुविधांची वाणवा असताना मध्य रेल्वे प्रशासन ठेकेदारांचे तळे उचलण्यासाठी प्रवाशांना भेटीत धरत असल्याने बदलापुरातील प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. भीक नको पण कुत्रे आवर असं या कामाच्या निमित्ताने म्हणण्याची वेळ आता बदलापूरकरांवर आली आहे.

इतिहास काय सांगतो

बदलापूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीन येथे मुंबई दिशेला रेल्वे रूळ ओलांडू नये म्हणून भिंत टाकण्यात आली होती. या भिंतीमुळे बदलापूर पूर्वेकडे राहणाऱ्या विशेषतः महिला प्रवाशांनी तीव्र विरोध केला होता. तेव्हा विद्यमान खासदार कपिल पाटील यांनी लोकसभेत शून्य प्रहरात हा मुद्दा मांडून ही भिंत तोडण्याची मागणी केली होती. दहा फूट भिंत बांधल्यामुळे प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला होता आणि कपिल पाटील यांना हा मुद्दा लोकसभेच्या शून्य प्रहरात मांडावा लागला होता. आता तर संपूर्ण रेल्वे प्लॅटफॉर्मच बंद करण्यात येणार असल्यामुळे प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट होऊ शकतो. यापूर्वी बदलापूरकरांनी सतत गाड्या उशिरा येत असल्याने केलेल्या रेलरोकोमुळे इतिहासात न घडलेली घटना रेल्वे प्रशासनाने बघितली होती. तत्कालीन डी आर एम ची उचल बांगडी अवघ्या 24 तासात करण्यास रेल्वे मंत्रालयाला भाग पाडलं होतं. कारण बदलापूरकरांनी शांततेच्या मार्गाने तब्बल सहा तास रेल रोको केला होता. या पुढील काळातही बदलापूरकर असेच उग्र आंदोलनाच्या पवित्रात असल्याचं रेल्वे प्रवाश्यांकडून सांगण्यात येत आहे.

हेही वाचा :

Back to top button