ठाणे : व्याजाच्या पैशावरून तिघांनी केली मित्राचीच हत्या | पुढारी

ठाणे : व्याजाच्या पैशावरून तिघांनी केली मित्राचीच हत्या

ठाणे : पुढारी वृत्तसेवा-व्याजाने दिलेल्या पैशाच्या वादातून तिघा मित्रांनी मिळून आपल्याच मित्राची हत्या केल्याची घटना ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी चितळसर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अक्षय कोंडीभाउ ठुबे (वय २५ वर्षे, रा. जुना म्हाडा, वसंतविहार, ठाणे) असे या घटनेत मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मृत अक्षय व या गुन्ह्यातील आरोपी गुरूनाथ काकडया जाधव (वय २७), करण अनिल सावरा (वय २४) आणि प्रशांत ऊर्फ बाबु मारूती जाबर (२१ वर्षे) यांच्यात २९ ऑगस्ट रोजी व्याजाने घेतलेल्या पैशावरून वाद उद्भवला होता. हा वाद मिटवण्यासाठी चौघे मित्र गुरूनाथ जाधव याच्या घरी २९ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एकत्र जमले होते.

याचवेळी वाद विकोपाला गेला आणि तिघांनी कोयत्याने वार करून अक्षयची हत्या केली. त्यानंतर तिघांनी मृतदेह कोकणीपाडा येथील अमराई नाल्याचे बाजुला नेवुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पेट्रोल टाकुन जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच मयताचे अंगावरील सोन्याची चैन, अंगठी व मोबाईल फोन काढून घेतले.

दरम्यान, मयत अक्षयचा मृतदेह बुधवारी मिळून आल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. त्यानंतर चितळसर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपासाची सूत्रे फिरवली व अवघ्या काही तासात तिघा आरोपींना बेड्या ठोकल्या. तिघांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Back to top button