

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाणे जिल्हा हा भारतीय जनता पक्षाचाच बालेकिल्ला होता, तो यापुढेही बालकिल्ला राहील, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारने केलेली कामे आणि त्यांच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवाव्यात, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी रविवारी ठाण्यात केले.
केंद्र सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोदी ९ अंतर्गत ठाणे लोकसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता.
त्यावेळी माजी खासदार विनय सहस्त्रबुध्दे, ग्रामविकास मंत्री गिरीश • महाजन, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सार्वजिनक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, गणेश नाईक, भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, आमदार मंदा म्हात्रे, गीता जैन आदि मान्यवर व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
ठाणे, कल्याण आणि पालघर हे मतदार संघ भाजपचे होते. रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे आणि जगन्नाथ पाटील, अशी ही शृंखला होती. यापुढेही हा जिल्हा भाजपाच राहील, असा दावा आमदार संजय केळकर यांनी केला. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही काम करीत आहोत, असा आव काही जण आणत आहेत. अशा फुकटच्या वलग्ना करण्याऐवजी पंतप्रधान मोदी यांनी आणलेल्या योजना तर राबवा, असा टोला केळकर यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना नाव न घेता लगावला