ठाणे : भिंत कोसळून ३ महिला कामगारांचा मृत्यू | पुढारी

ठाणे : भिंत कोसळून ३ महिला कामगारांचा मृत्यू

नालासोपारा; पुढारी वृत्तसेवा :  विरार पूर्वच्या मनवेल पाडा रोडवरील सूर्यकिरण या इमारतीचे रिडेव्हलपमेंटचे काम सुरू असताना भिंत कोसळून चार कामगार ढिगाऱ्याखाली अडकले. या घटनेत तीन महिला कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मंगळवारी दुपारच्या सुमारास हे कामगार काम संपल्याने निघत होते मात्र काम संपल्यानंतर साचलेल्या पाण्यातच हात पाय धुताना पाण्यासाठी गेले असताना ताजी बांधलेली भिंत अचानक या कामगारांच्या अंगावर कोसळली व त्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली चार कामगार अडकले होते. इतर नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर बचाव कार्य सुरू झाले व अग्निशमन दलाच्या पथकाच्या जावनांमार्फत त्यांना या कामगारांना रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचाराआधीच सादुबाई (४५), लक्ष्मीबाई गवाणे, राधा नवघरे (४०) या तीन महिला कामगारांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. या दुर्घटनेत जखमी असलेल्या नंदाबाई गव्हाणे (३२) या मजुरावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे बांधकाम करताना योग्य ती काळजी न घेतल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात असून विरार पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करून नेमका कोण दोषी आहे याचा तपास विरार पोलीस करीत आहेत. या घटनेची माहिती समजल्यानंतर कामगारांनी शोक व्यक्त केला.

 

 

 

Back to top button