पंतप्रधान मोदींकडून नऊ वर्षात सामान्यांना सुखी ठेवण्यास प्राधान्य: कपिल पाटील | पुढारी

पंतप्रधान मोदींकडून नऊ वर्षात सामान्यांना सुखी ठेवण्यास प्राधान्य: कपिल पाटील

मुरबाड: पुढारी वृत्तसेवा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने नऊ वर्षांत गरीबांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले.  सामान्य माणसाला सुखी ठेवण्याचा एकमेव उद्देश ठेवण्यात आला. नियोजनबद्ध लोकहिताच्या वेगवान विकासकामांमुळे सामान्य माणसाचे जीवन आनंदी होत आहे. जगभरात भारताचा लौकिक वाढला आहे. देशाची सुवर्णयुगाकडे वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज येथे केले.

कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो, आठ पदरी माजिवडा-वडपे बायपास, शहापूर-खोपोली महामार्ग आदींसह अनेक महत्वाचे प्रकल्प मार्गी लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच भिवंडी लोकसभा मतदारसंघात विकासाची नवी पहाट उगविली, अशी भावना  कपिल पाटील यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ९ वर्षांत केलेले कार्य व महाजनसंपर्क अभियानाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री पाटील यांनी विविध कामांची माहिती दिली.

कोरोना महामारीपासून ८० कोटी नागरिकांना मोफत अन्न-धान्य, आयुष्मान भारत योजनेतून पाच कोटी रुग्णांवर पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार, कोरोनावर २२० कोटी मोफत डोस, साडेतीन कोटी कुटुंबांना पक्के घर, ११ कोटी ७२ लाख शौचालये, १२ कोटी घरात नळाने पाणी, जनऔषधी केंद्रांवर स्वस्तात औषधे, १ रुपयात सॅनिटरी नॅपकिन, साडेनऊ कोटी भगिनींना मोफत गॅस जोडणी, प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक ६ हजार रुपये, खतांच्या किंमती कायम आदी महत्वपूर्ण काम केली आहेत.  गरिबांसाठी सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी कार्यरत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सिद्ध केले. केंद्र सरकारच्या प्रत्येक निर्णयात गरीबांच्या हिताचा व कल्याणाचा विचार केला गेला, असे प्रतिपादन पाटील यांनी यावेळी केले.

हेही वाचा 

Back to top button