ठाणे : राज्‍यातील युती सरकारच्या विश्वासाचा पाया मजबूत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

ठाणे : राज्‍यातील युती सरकारच्या विश्वासाचा पाया मजबूत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा घर सर्वाना मिळेल मात्र पाय मजबूत असायला हवा, राज्यातील युती सरकारला देखील पुढील महिन्यात एक वर्ष पूर्ण होत आहे. या एका वर्षात विश्वासाचा पाया मजबूत झाला आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील सदनिका आणि भूखंडांच्या विक्रीकरिता सोडत आज (बुधवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. या सोडतीत ४६४० सदनिका व १४ भूखंडांच्या विक्रीकरिता अनामत रकमेसह प्राप्त ४८,८०५ अर्जांची संगणकीय सोडत डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात काढण्यात आली. यावेळी शिंदे हे ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होते.

प्रत्येकाचे घराचे स्वप्न असते आणि हे स्वप्न साकार करण्याचे काम म्हाडाच्या माध्यमातून होत आहे. म्हडा आपली जबाबदारी यशस्वी पेलत असल्याचेही ते म्हणाले. घराबरोबर नोकरीची जबाबदारी देखील सरकारने उचलली आहे. त्यानुसार रोजगाराची १ लाख पदे भरण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे घर आणि नोकरी मिळाली तर खोळंबलेली लग्ने देखील आता होतील असेही ते म्हणाले. सोडतीत ज्यांना घरे मिळतील त्यांना त्यांच्या घरांचा ताबा लवकरात लवकर द्यावा असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

पंतप्रधान आवास योजनेतून देखील ९८४ घरे उपलब्ध करून देण्यात आल्याचे ते म्हणाले. यावेळी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भिवंडीतील ६ हजार रखडलेल्या घरांचा मुद्दा उपस्थित केला असता तो देखील लवकरच मार्गी लावण्यात यावा असे आदेश यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. या शिवाय मुरबाड येथे देखील म्हाडाच्या माध्यमातून घरांची निर्मिती केली जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी आमदार किसन कथोरे यांना दिले. बीडीडी चाळीचा विकास करताना येथे १६ हजार घरे दिली जाणार आहेत. तर धारावीचा विकास देखील म्हाडाच्या माध्यमातून केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

म्हाडाने मागील काही वर्षात लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. राज्यातील सरकारला देखील पुढील वर्षी एक वर्षे पूर्ण होणार आहे. या युती सरकारने देखील या एका वर्षात जनतेच्या मनात विश्वास निर्माण करून आपला पाया मजबूत केला असल्याचेही ते म्हणाले. राज्यात डबल इंजिनचे सरकार वेगाने काम करीत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा :  

Back to top button