ठाण्यात शाखा ताब्यात घेण्यावरून पुन्हा संघर्ष | पुढारी

ठाण्यात शाखा ताब्यात घेण्यावरून पुन्हा संघर्ष

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  ठाण्यात शाखा ताब्यात घेण्यावरून ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष वाढतच असून शिवाईनगर शाखेवरून दोन्ही गटांमध्ये वाद उफाळून आला. बंद असलेल्या शाखेचे कुलूप तोडून शिंदे गटाच्या वतीने शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. यावेळी दोन्ही गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमने- सामने आल्याने या परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा वाद मिटवला.

याआधी ठाण्यात शिवसेना शाखेवरून ठाकरे गट आणि शिंदे गटात राडा झाला होता. ही घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा ठाण्यातील शिवाईनगर येथील शिवसेना शाखेवरून दोन्ही गट आमने-सामने आले होते. यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के हे आपल्या कार्यकर्त्यांसह शिवाईनगर येथील शिवसेना शाखेवर आले होते. यावेळी त्यांनी शाखेचं कुलूप तोडून शाखा ताब्यात घेतली आहे. हा प्रकार घडल्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ५० खोक्यांवरून शिंदे गटातील नेत्यांविरोधात घोषणाबाजी केली. ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्यानं सांगितलं, ही शाखा गेली ३५ वर्षे शिवाईनगरमध्ये कार्यरत आहे. त्या शाखेवर कोणत्या तरी व्यक्तीने अनधिकृतपणे कुलूप तोडून ताबा घेतला आहे. माझं म्हणणं एकच आहे, कुलूप तोडून अशाप्रकारे ताबा घेण्याचा कायदा असेल तर तो कायदा आम्हाला दाखवा. त्यांच्याकडे कोर्टाची ऑर्डर असेल तर ती ऑर्डर आम्हाला दाखवावी. ते अशाप्रकारे ताबा घेऊ शकत नाहीत. सर्वोच्च न्यायालयात जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत शाखेवर ताबा घेण्याचा त्यांना कुणालाही अधिकार नाही. असे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

चावी दिली नाही त्यामुळे आम्ही कुलूप काढलं

दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी देखील यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ही शाखा शिवसेनेची शाखा आहे. ही आमची शाखा आहे. प्रताप सरनाईक यांनी ही शाखा बांधली आहे. धर्मवीर आनंद दीघे यांच्यानंतर ठाण्याचा संपूर्ण कारभार एकनाथ शिंदे यांनी सांभाळला आहे. कुलूप तोडायचा काही प्रश्नच नाही. या शाखेतून व्यवस्थित काम सुरू होतं. त्यांनी (ठाकरे गट) चुकीच्या पद्धतीने कुलूप लावलं. त्यांना आम्ही चावी मागितली, पण त्यांनी चावी दिली नाही. त्यामुळे आम्ही कुलूप काढलं आहे. येथे ठाकरे गटाचे एक-दोन लोक बसायचे. आम्ही त्यांना कधीही अडथळा आणला नाही.. पण आमच्याच घरात बसायला त्यांची परवानगी मागावी लागत असेल, तर आम्ही हे सहन करणार नाही. शिवसेना प्रमुखांनी आम्हाला अन्यायाविरोधात वाचा फोडण्याची शक्ती दिली असल्याचे म्हस्के यांनी स्पष्ट केले.

Back to top button