कल्याणच्या खाडी किनारी टी-८० युद्धनौका दाखल

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांपूर्वी मुंबईतील नौदलाच्या डॉकयार्ड मधून निघालेली युद्धनौका अखेर कल्याण खाडी किनाऱ्यावर दाखल झाली आहे. ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी होणाऱ्या प्रस्तावित स्मारकासाठी ही युद्ध नौका केडीएमसीकडून कल्याण येथे आणण्यात आली आहे. या नौकेने आपल्या पराक्रमी शौर्याद्वारे मानाचे स्थान मिळवले असून या नौकेचे नाव T-80 असे आहे.
कल्याण हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. याच शहरात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे पहिले आरमार (नौदल) खाडी किनारी उभे केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या कर्तुत्व, दूरदृष्टी आणि पराक्रमाची साक्ष म्हणून भारतीय नौदलाच्या या निवृत्त युद्धनौकेचे स्मारक उभारले जात आहे. आपल्या नव्या पिढ्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि कल्याणचा असणारा हा सुवर्ण इतिहास माहिती व्हावी आणि त्यातूनच तरुणांना प्रेरणा मिळावी. या उद्देशाने हे स्मारक उभारले जाणार आहे.
तत्कालीन आयुक्त डॉ. सुर्यवंशी यांच्या प्रयत्नांना यश
कल्याण डोंबिवली महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी खाडी किनारी युद्ध नौका उभारणीसाठी प्रयत्न केले होते. ही युद्ध नौका कल्याण खाडी किनारी यावी, यासाठी त्यांनी या विषयी जातीने लक्ष दिले होते. अखेर ही युद्ध नौका खाडी किनारी दाखल झाली.
युद्ध नौकेबाबत नोव्हेंबर महिन्यात झाला करार
भारतीय नौदलातील T 80 ही युद्धनौका कल्याणात स्मारक स्वरूपात विराजमान करण्याबाबत गेल्या नोव्हेंबर महिन्यात भारतीय नौदल आणि स्मार्ट कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशन (SKDCL) यांच्यात करार झाला होता. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या कुलाबा येथील नौदल डॉकयार्डमधून कल्याणच्या दिशेने रवाना झाली होती. यावेळी रिअर ॲडमिरल ए. एन. प्रमोद, कमांडर जिलेट कोशी, केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, तत्कालीन केडीएमसी आयुक्त आणि विद्यमान राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, शहर अभियंता अर्जुन अहिरे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा
- कल्याणमध्ये बिल्डरकडून रहिवाशांना मारहाण
- ठाणे : साहेब मी गद्दार नाही; कल्याणात ठाकरे गटाचे बॅनर
- मेट्रोचे काम संपले तरी सिग्नल सुरू होईनात! कल्याणीनगर येथेे कोंडी नित्याचीच