राहुल गांधी यांच्यावरील भिवंडी न्यायालयातील सुनावणी ४ मार्चला | पुढारी

राहुल गांधी यांच्यावरील भिवंडी न्यायालयातील सुनावणी ४ मार्चला

भिवंडी; पुढारी वृत्तसेवा :  खासदार राहुल गांधी यांनी २०१४ लोकसभा निवडणूक च्या प्रचारादरम्यान भिवंडीतील एका जाहीर सभेत वक्तव्य केले की, आरएसएसच्या कार्यकर्तानी महात्मा गांधी यांची हत्या केली. यामुळे आरएसएसची बदनामी झाल्याचे सांगत राहुल गांधी यांच्या विरोधात आरएसएसचे राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर शनिवारी भिवंडी जलदगती न्यायालयात सुनावणी होऊन या दाव्याची सुनावणीसाठी पुढील ४ मार्च रोजी होणार असल्याचे न्यायाधीश एल. सी. वाडीकर यांनी सुनावणीवेळी दोन्ही पक्षकारांच्या वकिलांना सांगितले.

भिवंडी न्यायालयामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भिवंडीतील पदाधीकारी राजेश कुंटे यांनी काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा दावा केला. त्या मानहानी बाबतच्या दाव्याची शनिवारी झालेल्या सुनावणी दरम्यान फिर्यादी राजेश कुंटे तर्फे अॅड. नंदू फडके यांनी बाजू मांडली, तर खासदार राहुल गांधी यांची बाजू अॅड. नारायण अय्यर यांनी मांडली आहे. राहुल गांधी यांचे वकील नारायण अय्यर यांनी सांगितले की, खासदार राहुल गांधी दिल्लीचे रहिवासी असून लोकसभा सदस्य आहेत, आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहेत.

त्यामुळे राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीत वकील त्यांचे प्रतिनिधित्व करतील आणि खटला पुढे चालवतील, या आधारावर कायमस्वरूपी सूट मिळावी म्हणून शनिवारी न्यायालयात युक्तिवाद झाला.  मात्र याचिकाकर्ता कुंटे यांच्या वकिलांनी राहुल गांधी यांना कायमस्वरूपी सूट देण्याच्या मुद्यावर आक्षेप घेतला. आता खासदार राहुल गांधी यांनी मागितलेल्या सुनावणीसाठी हजर राहण्यापासून कायमस्वरूपी सूट देण्याच्या मुद्द्यावर ४ मार्च २०२३ रोजी युक्तिवाद केला जाईल, असे राहुल गांधी यांचे वकील नारायण अय्यर यांनी सांगितले.

Back to top button